Ramdas Athawale
Ramdas Athawale Sarkarnama
मुंबई

पब्लिसिटीपेक्षा आम्हाला पाणी द्या; गायकवाड कुटूंबियांचा संताप पाहून आठवलेंनी घेतला काढता पाय

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : पाणी टंचाईमुळे डोंबिवली (Dombivli) देसलेपाडा येथील गायकवाड कुटूंबातील पाच जणांचा संदप येथील खदाणीत बुडून मृत्यु झाला. गायकवाड कुटूंबाची भेट घेण्यासाठी बुधवारी (ता.18 मे) केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) त्यांच्या घरी आले होते. यावेळी आठवले यांनी कुटूंबियांच्या दुःखात सहभागी होत, सहानुभूती दर्शवित 50 हजारांची मदत कुटूंबियांना करणार असल्याचे सुतोवाच करताच गायकवाड कुटूंबातील तरुण संतापले.

त्यांनी आठवले यांच्या अंगावर जात आम्हाला सहानुभूती नको, मदत नको...पाणी द्या. आमदार, खासदार, मंत्री येऊन गेले, आई, मुले, वहिनी गेली तरी अजूनही घरातील नळाला पाणी आले नसल्याची खंत गायकवाड कुटूंबियांनी यावेळी व्यक्त केली. पब्लिसिटी मिळविण्यासाठी येण्यापेक्षा आम्हाला पाणी द्या, असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला. गायकवाड कुटूंबातील सदस्यांचा रोष पहाता मंत्री आठवले यांनी येथून काढता पाय घेतला. आणि दोन मिनीटातच येथून निघून गेले. (Ramdas Athawale Latest Marathi News)

डोंबिवलीतील देसलेपाडा येथील पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात असून गावकरी संदप येथील खदाणीवरील पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी करतात. याचवेळी एक दुर्घटना घडून पोलिस पाटील सुरेश गायकवाड यांच्या घरातील पाच जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या निमित्त गायकवाड कुटूंबियांची भेट घेण्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले बुधवारी डोंबिवलीत आले होते. यावेळी त्यांनी मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर गायकवाड कुटुंबियांना मुख्यमंत्री फंडातून मदत निधी मिळावा यासाठी पत्रव्यवहार करु तसेच आरपीआयच्यावतीने 50 हजाराची मदत आम्ही गायकवाड कुटूंबियांना देत आहोत, असे आठवलेंनी म्हणताच...गायकवाड कुटूंबातील तरुण मंडळी संतापली. त्यांनी थेट आठवले यांना विरोध करीत आम्हाला मदत नको, आमची माणसे भरुन देणार आहात का? ते पुन्हा येणार आहेत का? असा सवाल केला.

यावर आठवलेंनी समाजाचा एक नेता म्हणून या दुःखात सामील होण्यासाठी येथे आलो असल्याचे सांगितले. येथे राजकारणासाठी आलेलो नाही. गायकवाड कुटूंबियांचे दुःख आमच्या शब्दाने कमी होणार नाही, त्यांची होणारी चिडचिड याची मला पूर्ण जाणीव आहे. गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी बोलून प्रयत्न करेल, असे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी चिडलेले सुरेश गायकवाड यांनी देखील आपली चिड व्यक्त करताना आमची पाच जीव गेली आहेत, दुसऱ्यांना तरी वाचवा त्यासाठी तरी पाणी द्या, अशी भावना पोट तिडकीने व्यक्त केली. पुन्हा घटना घडणार नाही याची दक्षता घ्या खदाणी बंद करा. बोलून, चर्चा करुन काय करणार आहेत, खासदार आमदार येऊन गेले कोणी पाणी दिले नाही. आजही आम्ही पाणी विकत घेतोय. आम्हाला देणगीची नाही तर पाण्याची गरज आहे असे त्यांनी आठवलेंना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT