मुंबई : ''उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या बैठकीतील माहिती बाहेर जाते. अवघ्या चार तासात ही माहिती केंद्राकडे गेली याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली पाहिजे. याबाबत राज्य पोलीस आणि पुणे पोलीस यांची चौकशी झाली पाहिजे,'' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासात पोलिसांची भूमिका योग्य नव्हती. त्यामुळं हे प्रकरण एसआयटीकडं देण्यात यावं, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहून केली होती. त्यावर काही निर्णय होण्याआधीच केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करून हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा तपास एनआयए कडे सोपविण्यास मान्यता दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नाराज झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्यात एसआयटी स्थापनेची मागणी करण्यात आली होती. त्यावर एसआयटी नेमण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते.
याबाबत बोलताना पवार म्हणाले ''ज्या दिवशी याचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली त्याच दिवशी केंद्राने एनआयकडे चौकशी दिली. राज्य सरकार या प्रकरणात लक्ष घालतय हे कोणी सांगितलं? बैठकीत उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे उद्योग केले असावेत,''
''एल्गार परिषदेने जी शपथ घेतली त्यात वादग्रस्त काही ही नव्हतं. ज्या प्रकारे या प्रकरणाचा तपास करण्यात आला हे मला लोकांपुढे आणायचं आहे. मी ही पोलीस दलाचा प्रमुख म्हणून काम पाहिलं आहे. आजची पोलीस विभागाची भूमिका पाहून मला चिंता वाटते, असे ते म्हणाले. सत्तेचा गैरवापर केला त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.