Mumbai News, 08 Jul : भूषण गवई हे काही दिवसांपूर्वी देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या गवई यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन आज महाराष्ट्र विधीमंडळात करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संविधान, लोकशाहीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
सरन्यायाधीशांच्या सत्कारासाठी विधानपरिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य विधीमंडळात उपस्थित होते. मंचावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित होते.
गवई यांनी विधिमंडळाने केलेला सत्कार स्वीकारत हा सत्कार आपल्यासाठी लाखमोलाचा आणि अमूल्य असल्याचं वक्तव्य केलं. मात्र, या सर्व सत्कार समारंभानंतर विरोधकांनी खासकरून ठाकरेंच्या आणि पवारांच्या शिलेदारांनी चांगलंच टायमिंग साधलं.
कारण सकाळपासून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत असलेल्या ठाकरे आणि शरद पवार गटातील आमदारांनी विधीमंडळातील सत्कार समारंभ आटोपल्यानंतर ज्यावेळी सरन्यायाधीश गवई विधिमंडळाच्या सभागृहातून बाहेर पडत होते. त्यावेळी त्यांना दोन पत्र दिली. यामध्ये त्यांनी गवई यांनी ज्या सभागृहात भाषण केलं.
त्या सभागृहातील विरोधीपक्षनेतेपद अद्याप रिक्त असल्याची आठवण त्यांनी सरन्यायाधिशांना करून दिली. शिवाय यावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाबाबतच्या सुनावणी तातडीने घेण्यात यावी याबाबतचं पत्र देखील सरन्यायाधीशांना देण्यात आलं.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरन्यायाधीशांना दिलेल्या पत्राबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "विधिमंडळात सरन्यायाधीश गवळीसाहेबांचा आम्ही सगळ्यांनी राज्याच्या वतीने सत्कार केला. शुभेच्छा दिल्या आणि आनंदही व्यक्त केला. मात्र, याचवेळी विरोधी पक्षाकडून विधिमंडळात काय चाललंय? विरोधकांचा आवाज कसा दाबला जातोय? याची माहिती दिली.
आता सुरू असलेलं विधिमंडळाचं चौथं अधिवेशन आहे. मात्र, अद्याप अध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपदाची निवड केलेली नाही. सत्ताधाऱ्यांकडे एवढं बहुमत असताना त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची काय भीती आहे? ते विरोधीपक्षनेते पद का देऊ शकत नाहीत? असे प्रश्न उपस्थित केल्याचं आदित्य यांनी सांगितलं.
तसंच यावेळी मागील अनेक वर्षांपासून रखडलेला आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहतोय त्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावरील सुनावणी प्रकरणाचा निर्णय देखील लवकरात लवकर व्हावा यासाठी विरोधकांनी दुसरं पत्र सरन्यायाधीशांना दिलं आहे.
याबाबतची माहिती देताना आदित्य ठाकरे म्हणाले, "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना पत्र दिलं. आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर राज्यात चार पक्षांची दोन दोन नावांमुळे जी गडबड सुरू आहे.
ती कुठेतरी शांत व्हावी राजकीय आणि सामाजिक अडचण दूर व्हावी याबाबतचा निर्णय लवकरात लवकर करावा अशी विनंती आम्ही त्यांना केल्याचं ठाकरेंनी सांगितलं. त्यामुळे आता या विरोधकांनी अचूक टायमिंग साधत आपल्या व्यथा थेट देशाच्या सरन्यायाधीशांसमोर मांडल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.