शरद पवार-फडणवीस Sarkarnama
मुंबई

`सत्तेवर पुन्हा न आल्याची जखम फडणविसांना खोलवर झालीय...`

सरकारनामा ब्यूरो

.

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढविला. त्यातही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निशाण्यावर राहिले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांना टोमणे मारत तर कधी खिल्ली उडवत त्यांनी जोरदार प्रहार केले. पवार यांनी एनसीबी, ईडी, आयकर विभाग या यंत्रणांवर भाष्य करत उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारात योगी सरकारवर निशाणा साधला.

केंद्र सरकार यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचे सांगत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईचा उल्लेख केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी काही आरोप केले. त्यातून वातावरण निर्मिती झाली. ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ आज कुठेही दिसत नाही. एक जबाबदार अधिकार बेछूटपणे आरोप करतो, असे कधी दिसले नव्हते. अनिल देशमुख यांनी आरोप झाल्यानंतर तात्काळ पदावरुन दूर जाण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला परमवीरसिंग यांच्यावर आता आरोपांची मालिका सुरु झाली आहे. हे आरोप होत असताना परमवीरसिंग गायब झाल्याचे दिसते. अनिल देशमुख यांच्या घरावर काल पाचव्यांदा छापा पडल्याचे कळले. पाच - पाच वेळेला एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला याचा अर्थ हा विक्रमच त्यांनी केला, असा मिश्किल टोला शरद पवार यांनी लगावला.

लखीमपूराचा प्रश्न आम्ही उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणीवस यांनी काही प्रश्न उपस्थित केल्याचे सांगत पवार म्हणाले की मावळच्या घटनेचा उल्लेख त्यांनी केला गेला. मावळ येथे शेतकऱ्यांच्या मृत्यूला राज्यकर्ते नाही तर पोलिस जबाबदार होते. त्या घटनेलाही बराच काळ उलटून गेला आहे. तरीही माजी मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा उल्लेख केला. मावळचे चित्र आज बदलले आहे. ज्यांच्यावर त्यावेळी मावळवासियांनी आरोप केले होते, त्यांचा या घटनेत काहीही हात नसल्याचे लक्षात आले. उलट भाजपच्या काही नेत्यांनी भडकावल्यामुळे त्याकाळी स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मावळ तालुक्यात जनसंघ आणि नंतर भाजपचे वर्चस्व होते. रामभाऊ म्हाळगी हे मावळचे लोकप्रतिनिधी होते. आज मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके हे ९० हजार मताधिक्याने निवडून आलेले आहेत. फडणवीस यांनी मावळचा उल्लेख केला ते बरं केले, कारण त्यांना आजची मावळची परिस्थिती काय आहे हे समजून घेतले तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोला पवार यांनी लगावला.

आता एखाद्या यंत्रणेवर आरोप केल्यानंतर संबंधित यंत्रणा बाजू मांडण्यासाठी पुढे येत असेल तर ठिक आहे. पण भाजपच सर्वात पुढे येऊन बाजू मांडताना दिसते. हे सर्वांसाठीच नवीन आहे. एखाद्या यंत्रणेकडून गैरवापर होत असेल तर त्यांची बाजू मांडण्यासाठी भाजपचे लोक पुढे येत आहेत, ही गंभीर बाब आहे असेही शरद पवार म्हणाले.

बाजू मांडणाऱ्यांमध्ये पुढे येणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आम्हाला एनसीबीचा अभिमान आहे. यंत्रणेचा अभिमान असणे ठिक आहे. पण कालच्या भाषणात त्यांनी सांगितले की, मी अजूनही मुख्यमंत्री असल्याचे वाटते. चांगली गोष्ट आहे त्यांना अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटते. मी पुन्हा येईन हे त्यांचे खरे न ठरल्याने आणि आम्ही मंडळींनी भाजपचे सरकार येऊ न दिल्याने सत्ता गेल्याची त्यांची जखम किती खोल आहे, हे यातून दिसते, असेही पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर पुढच्यावेळी मी विरोधी पक्षात काम केले आहे. त्यावेळी प्रशासनाने सत्तेवर असताना आपल्याला दिलेले अहवाल आणि जमिनीवरची वास्तवता वेगळी असते. विरोधात असताना लोकांमध्ये फिरल्यानंतर त्याचा अभ्यास होतो, असेही पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT