Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : पंतप्रधानांच्या माफीत मगरूरी; सरकारविरोधात उद्धव ठाकरेंचा 'गेट आऊट ऑफ इंडिया'चा नारा

Pradeep Pendhare

Mumbai News : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या निषेधासाठी महाविकास आघाडी आज मुंबईसह राज्यभरात महायुती भाजप सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे.

मुंबईच्या हुतात्मा चौकात 'मविआ' महायुती भाजप सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन केले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. "पंतप्रधानांनी मागितलेल्या माफीमध्ये मगरूरी होती", असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "महाराष्ट्रातील वातावरणाला राजकारण म्हणायला तयार नाही. शिवद्रोही मंडळी रस्त्यावर उतरली आहे, असे सत्ताधारी म्हणत आहे. पण सत्ताधारी करत असलेले राजकारण नाही. तर ते गजकरण आहे. त्यांना खाजवत बसू देत. या चुकीला माफी नाही. 'गेट वे ऑफ इंडिया', म्हणजेच देशाचे प्रवेशद्वार, तेथून शिवद्रोही सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया, गेट आऊट, म्हणायला आम्ही येथे जमलो आहोत". पंतप्रधानांनी माफी मागितली. माफी मागितली नसती, तर राज्याने, महाराष्ट्राने तुम्हाला शिल्लक ठेवले असते काय? माफी मागताना त्यांच्या चेहऱ्यावर मगरूरी होती. ती तुम्हाला पसंत आहे का? माफी नुसत्या शब्दांनी नसते, मगरूरीने माफी मान्य नाही, असा घाणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) माफी मागत असताना, त्यांच्या व्यासपीठावर काय झाले, यावर देखील उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागत असताना, त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, त्यात एक शहाणा, दोन दीड शहाणे, किती शहाणे हे मला माहीत नाही. 'एक फुल, दोन हाफ', त्यातील एक हाफ हासत होता, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला. मोदींनी माफी कशासाठी मागितली, महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली की, पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली की, भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी मागितली, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

'मविआ'च्या दिग्गज नेत्यांचा सहभाग

शिवद्रोही सरकारला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे संकल्प करत उद्धव ठाकरेंनी मगरूरीने माफी मागून चालणार नाही. ही जाग आली आहे, ती अशीच राहू द्या, असे आवाहन जनतेला करत शिवद्रोह्यांना 'गेट आऊट ऑफ इंडिया' करून दाखवूच. असे म्हटले. ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, शाहू महाराज, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देशमुख, राजेश टोपे, वर्षा गायकवाड, मिलिंद नार्वेकर, असे दिग्गज नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनस्थळी जाताना उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे दोघे जण एकत्र होते. नाना पटोले यांनी त्यांच्या हातात भगवा ध्वज घेतला होता. दुसरीकडे शरद पवार आणि शाहू महाराज एकमेकांचा हात धरून चालले होते.

परवानगी नसल्याने मोर्चावर कारवाई?

दरम्यान, मविआच्या जोडे मारो आंदोलनाला सरकारने परवानगी दिलेली नव्हती. हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत 'मविआ'चे नेते पायी गेले. त्यामुळे या भागात पोलिसांनी नो-पार्किंग झोन जाहीर केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय जय जयकाराच्या घोषणा दिल्या जात होत्या, तर महायुती भाजप सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. तशा शिवसेना स्टाईल घोषणा दिल्या जात होत्या. हुतात्मा चौकात आल्यानंतर 'मविआ'च्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. मोर्चाला परवानगी नसल्याने याबाबत आता काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे. मोर्चाला परवानगी नाकारल्याने खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत महाराष्ट्राचे खलनायक म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT