Sharad Pawar On Maharashtra Bandh Sarkarnama
मुंबई

Maharashtra Band : मोठी बातमी! महाविकास आघाडीत 'महाराष्ट्र बंद'वरुन गोंधळ; पवारांकडून बंद मागे; काँग्रेस अन् ठाकरे गट ठाम

Jagdish Patil

Mumbai News, 23 August : "भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा", असं आवाहन महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे.

बदलापूर अत्याचाराच्या घटनेसह राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदसाठी महाविकास आघाडीकडून सर्व तयारी देखील करण्यात आली होती.

अशातच 'कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, बंद केल्यास कायदेशीर कारवाई करावी' असे निर्देश मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) राज्य सरकारला दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

बंद मागे घ्यावा

शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या एक्स अकाऊंटवरुन याबाबतची भूमिका स्पष्ट केली. पवारांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवारी 24 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.

हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते."

दरम्यान, पवारांच्या या आवाहानावर आघाडीतील इतर मित्रपक्ष काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. काँग्रेसमधील काही नेते (Congress) बंदच्या भूमिकेवर ठाम आहेत. तर नुकतेच काही वेळापूर्वी शिवेसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत उद्याचा बंद पाळण्याचं जनतेला आवाहन केलं होतं. त्यामुळे आता ठाकरे गट पवारांच्या आवाहानावर काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसची भूमिका

पवारांनी बंद मागे घेण्याच्या आवाहान केल्यानंतर काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आम्ही न्यायालयाचा आदेश मानणारे आम्ही लोक आहोत. मात्र, बदलापूरमधील घटनेवरून जनतेत सर्वाधिक रोष आहे. तो कसा व्यक्त करायचा, हे चर्चा करून ठरविणार आहोत. आम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.

राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही

राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. तर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी पार पडली.

यावेळी न्यायालयाने 'कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी', असे निर्देश सरकारला दिले. यानंतर शरद पवारांनी "भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा", असे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT