शिरवळ : एटीएम कार्डची अदलाबदल करून हातचलाखीने लाखो रूपयांचा गंडा घालणारी आंतरराज्य टोळीतील चार संशयितांना शिरवळ पोलिसांनी अटक करून बेड्या घातल्या आहेत. संबंधित संशयिताकडून राष्ट्रीयकृत बॅंकेची ६५ एटीएम कार्ड, आठ हजार शंभर रुपयांची रोकड व कार असा तीन लाख आठ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई आनेवाडी टोल नाक्यावर शुक्रवारी सायंकाळी उशीरा करण्यात आली.
यासंदर्भात शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील निलेश शिवाजी सुर्वे यांना आसले (ता.वाई) व इतर ठिकाणाहुन आपल्या खात्यावरुन पैसे गेल्याचे कळल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गोवा येथून या संशयिताचा पाठलाग करुन आनेवाडी (ता. जावळी) येथील टोलनाक्यावर कार (क्रमांक एम.एच.०४ इटी ०३८९) ताब्यात घेतली.
यातील प्रदिप साहेबराव पाटील, विकी राजु वानखडे, किरण कचरू कोकणे व महेश पांडुरंग धनगर ( सर्व रा.म्हारळगांव, उल्हासनगर, ठाणे) या संशयितांना ताब्यात घेतल. दरम्यान, आज खंडाळा न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. एटीएममध्ये रांगेत थांबुन दुसऱ्याला पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलुन लाखो रूपयांचा गंडा ही टोळी घालत असे.
आतापर्यंत कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश व गुजरात तसेच नगर, सोलापुर या जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. यासंबंधी कोणाची तक्रार असल्यास शिरवळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांनी केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.