Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

शिवसेनेला हरवण्यासाठी मुन्नभाई, गद्दार एकत्र येत आहेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सगळे जण एकत्र येत आहेत. सगळे मिळून एकत्र या तुम्हाला आसमान दाखवतो. आपले काही गद्दार, मुन्नभाई एकत्र येत आहेत. हे माझे ठाकरे कुटुंब आहे, संपवा असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. शिवसेना (ShivSena) म्हणजे ढेकून नाही, कुणी चिरडून टाकेल, असा इशारा त्यांनी दिला.

शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गद्दार आहेत ते. गद्दारांमध्ये रक्त गद्दारांचे असते. कुत्र्यामध्ये निष्ठा असते. गोचीड गळून गेले, ते बरेच झाले. ढिगभर गद्दार असल्यापेक्षा मुठभर निष्ठावंत माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेवटची निवडणूक म्हणून लढा. पण आपण ही आपली पहिली निवडणूक आहे, असे समजून लढा.

उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावरून जोरदार टीका केली. मुंबईवरती सध्या गिधाडे फिरायला लागली आहे. त्यांना मुंबई बळकावयाची. मुंबईवर लचके तोडणारी गिधाडांची अवलाद फिरायला लागली. अमित शहा मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असे सांगितले. त्यांनी आम्हाला जरूर जमीन दाखवावी. मात्र, आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत-वाचत आम्ही मोठे झालेलो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह स्वराज्यावर चालून येत होते. अमित शाह मुंबईवर चालून आले आहेत. त्यांना माहीत नाही, इकडे जमिनीतून फक्त गवताची पाती उगवत नाही. तर तलवारीची पातीही उगवतात. तुम्ही आम्हाला जमीन दाखवण्याचा प्रयत्न करा, आम्ही पण तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे आज मी ठणकावून सागतोय, असेही ठाकरे म्हणाले.

मी गिधाडे हा शब्द मुद्दाम वापरला. निवडणूक आल्यावर त्यांना मुंबई दिसते. मात्र, जेव्हा मुंबईवर संकटे येतात, तेव्हा ही गिधाडे कुठे असतात, असा सवाल त्यांनी केला. यांच्यासाठी मुंबई ही केवळी विकण्यासाठी मिळालेली स्वेअर फुटातील जमीन आहे. मात्र, ही आमच्यासाठी केवळ जमीन नाही, मातृभूमी आहे. १०५ वीरांनी बलिदान देऊन मिळवलेली मातृभूमी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT