Hitendra Thakur-Shivsena
Hitendra Thakur-Shivsena Sarkarnama
मुंबई

भाजपच्या महाडिकानंतर शिवसेना नेते हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) राजकारणाने आता चांगलाच वेग घेतला आहे. राजकीय गाठीभेटी आणि डावपेचांच्या माध्यमातून एकमेकांना शह कटशहा दिला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) ज्या बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांना भेटले, त्याच ठाकूरांच्या भेटीसाठी शिवसेनेचे (Shivsena) शिष्टमंडळ विरारमध्ये दाखल झाले आहे. या शिष्टमंडळाची आमदार ठाकूर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, या चर्चेनंतर ठाकूर कोणती भूमिका जाहीर करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Shiv Sena delegation meet to MLA Hitendra Thakur)

राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होत आहे. महाविकास आघाडीकडून चार, तर भाजपकडून तीन उमेदवार रिंगणात उतरल्याने चुरस निर्माण झाली आहे. त्यात शिवसेना आणि भाजपमध्ये खरी लढत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाकडून आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. अपक्ष आणि छोट्या पक्षांना या निवडणुकीत कमालीचे महत्व आले आहे.

भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी कालच विरारमध्ये येऊन बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. त्यांच्याकडे तीन आमदार आहेत. महाडिक यांच्या भेटीनंतर आज (ता. ६ जून) शिवसेनेचे शिष्टमंडळ ठाकूर यांच्या भेटीला आले आहे. या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे खासदार आणि राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत, खासदार राजन विचारे यांच्या समावेश आहे. ते सध्या विरारमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या तास दिड तापासून आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू आहे.

स्थानिक राजकारणाचा विचार करता बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना एकमेकांच्या स्पर्धक आहेत, तसेच विधानसभा निवडणुकीतील विरोधाची किनारही आहे. दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, आणि राजेश पाटील हे तीन आमदार भाजपला मदत करणार की शिवसेनेला याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. मागील काही दिवसांपासून ठाकूर कुटुंबीयांच्या मागे सक्त वसुली संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा लागला आहे. त्यामुळे ठाकूर आपल्या तीन आमदारांचे वजन कोणाच्या पारड्यात टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेने आपले लक्ष वसई-विरार आणि पालघरकडे वळवले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे तर गेल्या काही वर्षांत पालघर जिल्ह्यात चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढत चालली आहे. वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यामुळे एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. त्याबाबत या बैठकीत काय तोडगा निघतो, हेही पाहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT