Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

'मातोश्री' गिफ्ट प्रकरणावर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले अन् म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

रत्नागिरी : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yasahwant Jadhav) यांच्याकडे आयकर विभागाने (Income Tax) केलेल्या तपासात कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरी सापडली आहे. डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला 2 कोटी रुपयांच्या भेटीचा उल्लेख आढळून आला आहे. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मंगळवारी पहिल्यांदाच भाष्य केलं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराचे नावही मातोश्री असल्याने भाजपने सडकून टीका केली आहे. भाजपनं याबाबतच ट्विट करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. भाजपनं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'योगायोग किती मोठा आहे! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्याचे नाव देखील 'मातोश्री' आहे. दोन्ही हातात घड्याळ असते, याचं गुपित 50 लाख तर नाहीत?' या ट्विटमुळं चर्चेला उधाण आलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या दोन्ही हातात अनेकदा घड्याळ पाहायला मिळते. त्यामुळं भाजपने त्यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा आहे.

या प्रकरणावर रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी या अफवा पसरवल्या जात असल्याचे सांगितले. अशा अफवांवर किती विश्वास ठेवायचा हे ठरवायला हवं. याबाबत अधिकृत माहिती समोर येईलच. केंद्रीय तपास यंत्रणा जिथे-जिथे मागे लावल्या आहेत, तिथे त्या तोंडावर पडतील, असंही ठाकरे म्हणाले. तसंच त्यांनी भाजवरही (BJP) निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी घाणेरडं राजकारण केलं जात आहे. हे महाराष्ट्रासह देशासाठीही योग्य नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

तानाजी सावंतांच्या टीकेवरही भाष्य

शिवसेना (Shiv Sena) आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सोमवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी थेट महाविकास आघाडीवरच बोट ठेवलं. आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल, तोवर सहन करू. आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही, असं म्हणत त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याबाबतचे सूचक वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनीही त्यांना सूचक संदेश दिला आहे.

कोकण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांना सावंत यांच्या या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक जण कुठला तरी पालकमंत्री असतो. मीही मुंबई उपनगरचा पालकमंत्री आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. जिथं दोन पक्ष एकमेकांविरोधात लढतात, तिथे खदखद असतेच. आम्ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आघाडीचे नेते एकत्रित बसून महाराष्ट्रासाठी ही आघाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो असून राजकारणात थोडंफार पुढे-मागे होत असतं, असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

सत्तेतून बाहेर पडण्याबाबत सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाकरे म्हणाले, हे त्यांचं वैयक्तिक मत असेल. प्रत्येक मतदारसंघाला न्याय देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. याआधीही आणि आताही सर्वांना समान न्याय दिला जात आहे. नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं म्हणत ठाकरे यांनी सावंत यांचे आरोप फेटाळून लावत त्यांना जणू सूचक संदेश दिल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT