<div class="paragraphs"><p>Sanjay Raut</p></div>

Sanjay Raut

 

sarkarnama

मुंबई

भाजपला देणगी दिल्याने देश कसा मजबूत होणार ; शिवसेनेचा सवाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihar Vajpayee) यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपनं निधी उभारण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, चंद्रकांत पाटील यांनीही देणगी दिली असून देशाील वेगवेगळे कार्यकर्ते या देणगी अभियानाशी जोडले जात आहेत.

‘माइक्रो डोनेशन अभियान’ असं या अभियानाचं नाव आहे. हे अभियान ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत राबवले जाणार आहे. या अभियामानवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चर्चेचा विषय केला आहे. भाजपच्या या अभियानावर शिवसेनेनं टीका केली आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपची खिल्ली उडवली आहे. ''जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. ''भाजपला देणगी दिल्याने देश कसा मजबूत होणार,'' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

''अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी हजारो कोटी रुपये आधीच जमा झाले असतानाही रामाच्या नावावर जनतेकडून पावत्या फाडण्याच्या प्रकारांवरही टीकेची झोड उठली. भाजपच्या श्रीमंतीचे टोक किती उंचावर गेले आहे ते अयोध्येत भाजप परिवारांतील प्रमुख लोकांनी केलेल्या जमीन खरेदीवरून काल दिसले. ही अशी श्रीमंती ओसंडून वाहत असताना विशेष देणगी मोहीम राबविण्याचे प्रयोजन काय? याचेही उत्तर मोदी यांनी देऊन टाकले आहे. ‘देशास सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या व आजन्म देशसेवा करणाऱ्या आमच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या संस्कृतीला या मोहिमेमुळे अधिक बळ मिळेल. तुमच्या मदतीमुळे भाजप व आपला देश आणखी बलाढय़ होईल’, अशी चिंता पंतप्रधान मोदींनी करावी हे आश्चर्यच आहे,'' असे अग्रलेखात म्हटलं आहे.

''उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मैदानातील एक प्रमुख खेळाडू बहनजी मायावती या स्वतःच तंबूत परतल्या आहेत. याचे रहस्यही सगळे जण जाणून आहेत. यामागे कोण व का? हे उघड आहे,'' असे राऊत म्हणाले.

''देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले . कालपर्यंत वाटत होते असंख्य हुतात्मे , स्वातंत्र्यवीर , महात्मा गांधी , पंडित नेहरू , सरदार पटेल , इंदिरा गांधी , डॉ.आंबेडकर यांच्यासह मेहनत करून घामाचे शिंपण करणारे लोक, शास्त्रज्ञ, सैन्य यांच्यामुळे आपला देश बलाढय़ होत जाईल , पण हे सर्व कुचकामी असून भाजपच्या देणगीच्या पावत्या फाडल्याने देश मजबूत होईल . यामुळे देश आणखी बलाढय़ खरंच होईल ? लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर देणगी मोहिमेचे स्वागत करायला हरकत नाही,'' असे टोमणा शिवसेनेनं लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT