Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

`संजय राऊत यांचं तोंड 24 तासही बंद राहू शकले नाही...`

विष्णू सानप

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल (ता. 29 मार्च) दुपारपासून धारण केलेले मौन आज (ता. 30 मार्च) सकाळीच सोडले आहे. काल राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं, असे म्हटले होते. यामुळे आता राऊत काही काळ राजकीय वक्तव्य करणार नाहीत किंवा कुणावर टीका करणार नाही, असे अनेकांना वाटले होते. मात्र, त्यांनी 24 तास होत नाही तोच दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांना यूपीएचे (UPA) चेरमन करण्याची आपली मागणी केली आणि आपले मौन सोडले आहे.

राऊत हे गेली अडीच वर्षे दिवसातून एकदा तरी टिव्ही कॅमेऱ्यासमोर येऊन बाईट देत असल्याचे दिसून आले आहे. या त्यांच्या उपक्रमात फारच कमी वेळा व्यत्यय आला. दिवसभराचे राजकीय नॅरेटिव्ह तेच सेट करत असल्याचे त्याचे विरोधकही मान्य करतात. मात्र त्याच राऊत यांनी मौनाचे महत्व सांगितल्याने ते स्वःत मौनात जाणार, अशी चर्चा होती. पण त्यांनी ते वाक्य फक्त सुविचार म्हणून सांगितले होते, असे चोवीस तासांतच स्पष्ट झाले.

राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना यूपीएचे चेअरमन करावे, असा ठराव काल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात करण्यात आला आहे. यावर माध्यमांनी राऊतांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, शरद पवार यांना यूपीएचे चेअरमन करा ही मागणी मी सहा महिन्यांपूर्वीच केली होती. सर्व विरोधकांना पवार हे एकत्र करू शकतात व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोठी ताकद उभी राहू शकते. पवारांना जर यूपीएचे चेअरमन केले तर यूपीएची ताकद वाढेल, असा दावाही राऊतांनी यावेळी केला आहे.

याचबरोबर राऊतांनी भाजपचे बंडखोर खासदार वरुण गांधींना (Varun Gandhi) भोजनाचे निमंत्रणही दिले होते. त्यानुसार त्यांनी काल (ता.29 मार्च) रात्री गांधी यांच्यासोबत भोजन करत सुमारे दोन तास गप्पा केल्या. यावरही राऊतांनी खुलासा केला आहे. वरूण गांधी यांचे ठाकरे परिवाराशी चांगले संबंध असून त्यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत विशिष्ट भूमिका घेतली होती. या मुद्द्यावर आणि देशातल्या अन्य राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे राऊतांनी सष्ट केले.

दरम्यान, नेहमी आक्रमकपणे विरोधकांवर हल्लाबोल करणारे राऊत हे मौनाची भाषा का करत आहेत, अशी चर्चा राऊतांनी केलेल्या मौनाच्या ट्वीटवर दिवसभर चर्चा रंगली होती. राऊतांनी नेमके कोणत्या कारणाने मौन धारण केले याचे तर्क-वितर्कही लावले जात होते. तर राऊतांच्या मौनावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याकडेही सर्वांचे लक्ष होते. मात्र, मोहित कंबोज सोडले तर कुणीही भाजप नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलेली दिसली नाही. कंबोजांनी राऊतांच्या ट्वीटला प्रतिसाद देतांना म्हटले होते की, आता तुम्ही परिपक्व झालात. पाहून आनंद झाला सर, असे म्हणत राऊतांच्या मौनाची खिल्ली उडवली. तर अनेक नेटकऱ्यांनीही राऊतांच्या ट्वीटवर आपले मत मांडले तर, काहींनी राऊतांनी मौनच पाळावे, असा सल्लाही देऊन टाकला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT