Mumbai News : शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचे आहे. कारण की, शिवसेनेची स्थापना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच शिवतीर्थावर केली. त्यामुळे हे मैदान आपलेच आहे. तर या पलीकडे असलेले शिवतीर्थ आपलेच असल्याचे सांगत त्यांनी राज ठाकरे यांच्या सोबतच येत्या काळात होत असलेल्या युतीबाबत संजय राऊत यांनी संकेत दिले. गेल्या तीन महिन्यापासून ते ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे संकेत देत आहेत. त्यामुळेच राऊतांचे भाषण पुन्हा एकदा मनसे-उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चेतच अडकल्याचे दिसले.
शिवसेना उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा गुरुवारी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर पार पडला. त्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर चिखल असतानाही शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. पाऊस असला तरी शिवसैनिकांचा उत्साह कमी झाला नाही. यावेळी दसरा मेळाव्याला मार्गदर्शन करताना संजय राऊत यांनी सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली.
गेल्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत सत्ताधारी पक्षाने फक्त चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्यांदा पक्ष चोरला, चिन्ह चोरले, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची तीच अवस्था केली आहे तर मत चोरी करून विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे या भाजप सरकारने फक्त चोरी करण्याचे काम केले आहे. त्यामुळे मुंबईतील चोर बाजाराचे नाव बदलायला हवे, असा उपरोधिक सल्ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिला.
त्यासोबतच यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, शिवाजी पार्कवर चिखल असल्याने आम्ही ही चिखलफेक दुसऱ्यावरच करणार आहोत. महायुती सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आम्ही करीत आहोत, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करण्याची आपली पद्धत आहे. त्यामुळे मुंबईत असलेल्या पावसाळी परिस्थितीमुळे मुंबईतील रावणाला बुडवायची वेळ आली आहे तर दुसरीकडे दिल्लीतील रावणाचे दहन करण्याची जबाबदारी शिवसैनिकांवर असल्याचे राऊत म्हणाले.