CM Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

CM Eknath Shinde : ''...म्हणून हाती यंत्रणा असूनही इर्शाळवाडीत वापरु शकलो नाही'' ; मुख्यमंत्र्यांची खंत

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडीत दुर्घटनेत २० लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती विधानसभेत शुक्रवारी दिली. अशा घटनांमध्ये बचावासाठी सर्व यंत्रणा हाताशी असूनही त्यांचा वापर करता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. पाऊस, वारा, धुकं चिखल, खराब अशा खराब हवामानाचा सामना करत बचाव व मदतकार्य अद्यापही सुरु असल्याचे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभे(Vidhansabha)च्या सभागृहात इर्शाळवाडीच्या दुर्घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी मन हेलावून टाकणारी अतिशय विदारक घटनास्थळाचं वास्तव सभागृहात मांडले. शिंदे म्हणाले, उंच डोंगरावर, जिथे नीट रस्ता नाही. सायकलही जाऊ शकत नाही अशा डोंगर कपारीमध्ये इर्शाळवाडी हे गाव वसलेलं आहे. सुरूवातीला आम्हांला संपू्र्ण गावावरच डोंगर कोसळला असल्याची माहिती मिळाली होती. पण काहीवेळातच घटनास्थळी पोहचलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावातील १७ ते १८ घरांवरच डोंगराचा कडा कोसळला असल्याची माहिती मिळाली.

यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा, तहसीलदार, प्रांत असे सगळेच तात्काळ घटनास्थळी पोहचले. मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan), महेश बालदी, दादा भुसे, रात्री तीन वाजता तिथे पोहचले होते. यशवंती हायकर्स, ३४ ग्रामस्थ, वरोसेचे २० ग्रामल्थ नगरपालिका, कोलारचे रिव्हर फायटर्स, एनडीआरएफचे ४ टीम, सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे २५ जण, १०० जवानांचे टीटीआरएफचे पथक तिथे पोहचले. या सगळ्यांनी बचावकार्यात मोलाची कामगिरी बजावली. आदिती तटकरे, अनिकेत तटकरे तिथे पायथ्याला होते. इर्शाळवाडीच्या पायथ्यालाच आपण रुग्णवाहिका वगैरे अशी व्यवस्था आपण केली होती असंही शिंदे यांनी सभागृहात सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें(Eknath Shinde)नी इर्शाळवाडीची विदारक परिस्थिती सभागृहात मांडताना कमालीची शांतता पसरली होती. शिंदे म्हणाले, अशा घटनांमध्ये इतरवेळी जेसीबी, पोकलॅँड असं सर्वकाही लागतं. पण इर्शाळवाडीत ही यंत्रणा राबवणं कठीण होतं. तिथे जी काही ५० एक घरं राहत होती. वरती मॅन्युअली करण्याशिवाय पर्याय नव्हता हेही वास्तव मुख्यमंत्र्यांनी मांडले.

एकीकडे मलबा हटवण्याचा काम सुरु होते तर दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क करुन त्याची विल्हेवाट लावण्याचं काम सुरु होतं. अतिशय विदारक परिस्थिती तिथे होती. सर्व माणसांनी तिथे माणुसकी दाखवली. रेस्क्यू टीमला हवी ती मदत तिथे लोकांनी केले. मृतांच्या नातेवाईंकांना पायथ्याला आणून त्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंची खंत...

आपल्याकडे सर्व यंत्रणा असून देखील दुर्दैवानं ती वापरु शकलो नाही याची खंत आहे. पण दोन दिवसानंतरही काही लोकं जिवत निघाली असल्याचा इतर घटनांमधला अनुभव आहे. त्यामुळे आपण अशीच प्रार्थना करु शकतो. अजूनही बचाव व मदतकार्य अद्यापही सुरु आहे. पण एनडीआरएफच्या जवानांचं काम खरोखर वाखाण्ण्याजोगं आहे. अतिशय मनापासून, आणि जीव धोक्यात घालून काम करत असल्याचं आम्ही पाहिलं आहे. आता ४५ ते ५० कंटेनरची व्यवस्था करण्यात आली असून ३० कंटेनरमध्ये सध्या तिथे आले आहेत. त्यामध्ये जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यात त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT