Anil Parab, ST Strike
Anil Parab, ST Strike sarkarnama
मुंबई

एसटीची कारवाई सुरूच : 238 जणांची सेवा समाप्त; तर 297 निलंबित

सरकारनामा ब्युरो

सातारा : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. कामावर हजर होण्यासाठी २४ तासांची मुदत देऊनही कर्मचारी हजर न झाल्याने आज २३८ रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तसेच आज आणखी २९७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा आता २७७६ झाला आहे. महामंडळाने कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले असून कामावर रुजू होणार्‍या कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्याचीही तयारी केली आहे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासनात सामावून घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी २४ तासांत कामावर हजर व्हावे, अशी सूचना केली होती. त्याकडे संपकरी कर्मचाऱ्यांनी दूर्लक्ष केल्यामुळे महामंडळाने आज एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एसटीकडे रोजंदारीवर २२९६ कर्मचारी आहेत. त्यातील आज दिवसभरात २३८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच २९७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या २७७६ कर्मचाऱ्यांचे आजपर्यंत निलंबन झालेले आहे. संप असूनही आज दिवसभरात १३१ एसटी बसेसच्या माध्यमातून ३५१७ प्रवाशांनी प्रवास केला असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. उद्या आणखी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन मंत्र्यांकडून सांगण्यात आले. तसेच टप्प्याटप्प्याने उर्वरित कर्मचार्‍यांवरही सेवा समाप्तीची कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने आजही कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे. कामावर रुजू होणार्‍या कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्याचीही एसटी महामंडळाची तयारी आहे.

यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कालच्या बैठकीत एसटी रूळावर आणण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला आहे. संबंधित कंपनीला सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात एसटी खाजगीकरणाचा विचार नसून हा पर्याय आहे. महामंडळाच्या विलिनीकरणाबाबतचा निर्णय समितीच घेईल, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. संप मिटविण्यासाठी चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना ते युनियनचे ऐकतायत ना भाजप नेत्यांचे, असा टोलाही मंत्री परब यांनी हाणला आहे. एसटीचे आंदोलन नेतृत्वहीन झालंय. त्यामुळे आता कामगारांनीच सांगावं कुणाशी बोलावे. ते सांगतील त्यांच्याशी बोलायला आम्ही तयार आहोत. आम्ही वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करतोय. तेथील वाहतूक व्यवस्था आणि कर्मचा-यांचे वेतन याचा आढावा घेतला जातोय.

आंदोलनासंदर्भात गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोनदा बोललो आहे. पण त्यानंतर संपर्क झालेला नाही. त्यांनी कामगारांना आझाद मैदानात आणले आहे. हे सर्व करण्यापेक्षा त्यांनी चर्चा करावी. पण संपाबाबत निर्णय कामगारांनी घ्यायचा आहे. फडणवीस यांनी प्रवाशी कराचा फॉर्म्यूला सांगितला, जो आम्ही गांभीर्याने घेतला आहे. कोरोनापूर्व काळात हा फॉर्म्यूला शक्य होता. आता खूप मोठा गॅप पडलाय. आताही तो करता येईल. त्यासाठी संप मागे घ्यावा लागेल. शासनाचे आर्थिक गणित पाहूनच मगच निर्णय घेतला जाईल. जे रोजंदारी कर्मचारी २४ तासांत हजर राहिलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT