Param Bir Singh
Param Bir Singh  Sarkarnama
मुंबई

मुंबईत पाऊल टाकताच परमबीरसिंहांच्या अडचणी वाढल्या!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) तब्बल सहा महिन्यांनी मुंबई दाखल झाले आहेत. मात्र, त्यांनी मुंबईत पाऊल टाकताच त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परमबीरसिंहांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले असून, याविरोधात राज्य सरकार आता दाद मागणार आहे.

परमबीरसिंह हे चंडीगड येथून मुंबईत आल्याचे समजते. खंडणीसह त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यांना आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. सध्या ते गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले आहेत. सहा महिन्यांनंतर मुंबईत पाऊल टाकताच त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परमबीरसिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या संरक्षणाच्या विरोधात राज्य सरकार दाद मागण्याची शक्यता आहे, अशी महिती सूत्रांनी दिली आहे.

परमबीरसिंह यांच्या विरोधात खंडणी व अॅट्रोसिटीसारख्या 5 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील 3 गुन्ह्यांमध्ये त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे. या गुन्ह्यांच्या तपासा संदर्भात त्यांची चौकशी करणे हे महत्वाचे आहे. परमबीरसिंह यांच्या विरोधात 3 अजामीनपात्र अटक वॉरंट असतानाही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकार दाद मागणार आहे. त्यांना मिळालेलं संरक्षण रद्द करण्याची मागणी करू सरकार करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने परमबीरसिंह यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासही बजावले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारसह सीबीआयला न्यायालयाने नोटीस बजावली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी परमबीरसिंह यांच्या वकिलांनी ते भारतातच असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. त्यांच्या जिवाला धोका असल्याने ते लपून बसल्याचेही वकिलांनी सांगितले. पुढील 48 तासांत सीबीआयसमोर हजर राहण्याची कबुलीही त्यांनी दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी 6 डिसेंबरला होणार आहे.

मे महिन्यात वैद्यकीय सुटीवर गेलेले परमबीरसिंह हे अनेक महिने नॉट रिचेबल होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते गुरूवारी मुंबईत दाखल झाल्याचे समजते. मुंबईत आल्यानंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशीला सामोरे जाण्यासाठी मी आलो आहे. आत्ताच मी काही बोलणार नाही. मी आता न्यायालयातच बोलेन, असे परमबीरसिंह यांनी वृत्तवाहिनील्या दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT