Aditya Thackeray, Bhushan Desai
Aditya Thackeray, Bhushan Desai Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray: सुभाष देसाईंच्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...

सरकारनामा ब्युरोे

Maharashtra Politics: ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यावर अदित्य ठाकरेंनी त्यांना ज्या 'वॉशिंग मशिन'मध्ये जायचे ते जाऊ द्या, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे. तसेच भूषण देसाई आणि ठाकरे गटाचा काही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले.

विधिमंडळाबाहेर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शीतल म्हात्रे यांचा 'व्हिडीओ व्हायरल' होत आहे. तो ठाकरे गटाशी संबंधित लोकांनी केल्याचा आरोप होत असल्याचे विचारण्यात आले. त्यावेळी ठाकरेंनी थेट शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. तसेच ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांच्या शिवसेनेतील प्रवेशावर थेट भाष्य केले आहे.

ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा मुलगा भूषण देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यावर आदित्य ठाकरेंनी त्यांना ज्या 'वॉशिंग मशिन'मध्ये जायचे ते जाऊ द्या असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे. ते म्हणाले, "आजही सुभाष देसाई ज्या वयात आहेत त्या वयातही युवकाप्रमाणे काम करतात. शिवसैनिक आजही न्यायासाठी लढत आहेत. आम्ही त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. ज्यांचा पक्षाशी काही संबंध नव्हता, ते कोणत्याही 'वॉशिंग मशिन'मध्ये जात असतील तर जाऊ द्या."

सुभाष देसाई ठाकरे गटाच्या जवळचे आहेत. मात्र त्यांचा मुलगा शिवसेनेत जात आहे, हा ठाकरेंना अजिबात धक्का नाही, असे स्पष्ट मतही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले, "४० गद्दार पाठीत खंजीर खुपसून गेले, ते वार पाठीवर घेऊन फिरत आहोत. तो धक्का वेगळा असतो. ज्यांचा आमच्याशी काही संबंध नव्हता, ते गेले म्हणून काही धक्का बसत नाही. मात्र आम्ही आमचं काम करत आहोत. महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे राज्यासाठी सुवर्ण काळ होता. आज तो महाराष्ट्र अंधकारात गेला आहे. त्यावेळी राज्यातील विविध भागात साडेसहा लाख कोटींची गुतवणूक करण्यात आली. शेतकऱ्यांपुढे आलेल्या समस्या कोविडकाळातही कमी केल्या. कर्जमुक्ती दिलीच तर मदतीच्या स्वरुपात आधारही दिला."

शीतल म्हात्रे (Shital Mhatre) यांच्या 'मॉर्फ' केलेल्या 'व्हायरल व्हिडीओ'मुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आतापर्यंत या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांचाही समावेश आहे. या प्रकरणी अदित्य ठाकरे यांनी सरकारवर घणाघात केला आहे. 'व्हायरल व्हिडीओ'वरून राज्यातील ज्वलंत प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, "व्हिडीओच्या विषयाकडे लक्ष देत नाही. कारण अशा विषयांच्या माध्यमातून राज्यातील ज्वलंत विषयांना बगल दिली जात आहे. राज्यात शेतकरी अडचणीत आहेत. बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न कायम आहे. कुणी काही आरोप केले तरी राज्याला माहिती आहे 'त्या' पातळीवर आम्ही जात नाही. राज्याच्या विकासासाठी आम्ही आमचे काम करत राहू."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT