Shivsena| BJP
Shivsena| BJP 
मुंबई

दहशत Opration Lotus ची ; मग केंद्र सरकारला भिती कशाची ?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्र सरकार व त्यांच्या सूत्रधारांना 2024 चे भय वाटते आहे. हे भय केजरीवाल, ममता, उद्धव ठाकरे, नितीश कुमार व शरद पवारांचे (Sharad Pawar) आहे. इतके मोठे बहुमत असताना या मंडळींना भय का वाटावे? याचे उत्तर एकच. त्यांचे बहुमत निखळ नाही. ते चोरलेले आहे. धाडसत्र व सूडाची छापेमारी ही त्यांची शस्त्रे. त्याच शस्त्रांनी त्यांचे ‘ऑपरेशन कमळ’ होते, पण कमळाच्या लाभार्थींवर सरकारी छाप्यांचे वार होत नाहीत. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला." अशा शब्दांत शिवसेनेने (Shivsena) भाजपवर (BJP) टीकास्त्र डागले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर आता बिहार, पश्चिम बंगाल आणि आता दिल्लीमध्येही ईडी सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र सुरु आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात सुरु असलेल्या तपास यंत्रणांच्या कारवायांकडे शिवसेनेने लक्ष वेधले आहे. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

'दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन कमळ ‘फेल’ गेले आहे. भाजप उघडा पडला आहे’, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. बिहारमध्येही ‘ऑपरेशन कमळ’ चालले नाही व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी अमित शहा यांना खुले आव्हान दिले की, ‘‘ईडी, सीबीआय वगैरे लावून माझे सरकार पाडून दाखवा.'' असे म्हणत शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. तसेच, महाराष्ट्रात ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला तसे इतर राज्यांत कोणी वाकायला तयार नाहीत. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला आहे.

ईडी, सीबीआयचा वापर करून केजरीवाल यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनीष सिसोदियांवर अटकेची टांगती तलवार आहे. सिसोदिया हे काही पळून जाणारे गृहस्थ नाहीत, पण एखाद्या गुन्हेगारांप्रमाणे त्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी करून लोकनियुक्त सरकारची मानहानी केली गेली. म्हणूनच देशाची स्थिती संभ्रमित आहे, असे श्री. पवार म्हणतात ते खरे आहे. हे सर्व केजरीवाल यांचे सरकार पाडण्यासाठी सुरू असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

पण, श्री. मनीष सिसोदिया यांनी भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’वर बॉम्ब टाकला आहे. ‘‘भाजपमध्ये प्रवेश करा, ‘आप’चे आमदार फोडून आणा व मुख्यमंत्री व्हा. तसे केल्यास आपल्या विरोधातील ईडी, सीबीआयची सर्व प्रकरणे बंद करू,’’ अशी ऑफर भाजपने दिल्याचा दावा सिसोदिया यांनी केला. ‘आप’चे आमदार फोडण्यासाठी वीस-वीस कोटी रुपयांची ‘ऑफर’ दिल्याचा आरोप तर स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच केला आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन कमळ’ हे लोकशाही व स्वातंत्र्यासाठी किती घातक आहे, याकडेही शिवसेनेने लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्रात याच पद्धतीने ऑपरेशन केले गेले, पण मोठे राज्य असल्याने व शिवसेना पह्डणे हाच मुख्य अजेंडा असल्याने ईडीचा धाक अधिक पन्नास ‘खोके’ अशी बेगमी केली असे सर्रास बोलले जाते. महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली तसे दिल्लीचे आमदार व त्यांचे नेते पळाले नाहीत. ते भाजप व ईडीविरोधात ठामपणे उभे राहिले. अशी टीकाही राज्यातील बंडखोर आमदारावर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT