eknath shinde, Uddhav Thackeray
eknath shinde, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

शिवसेना कुणाची, ठाकरेंची की शिंदेंची ? ; कायदा काय सांगतो..

सरकारनामा ब्युरो

पुणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडानंतर राज्याचे राजकारण वेगळ्या दिशेनं जात आहे. सध्याच्या राजकीय चित्रानुसार शिवसेनेचा मोठा गट सरकारबाहेर आहे. एकंदर सरकार अल्पमतात असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त म्हणजेच दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. (eknath shinde latest news)

शिंदे यांच्या या वेगळ्या गटाने राज्यपालांना ठाकरे सरकारचा (Thackeray government) पाठिंबा काढल्याचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे शिंदेकडे असलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता शिवसेना कुणाची असा सवाल विचारण्यात येत आहे. राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट (Ulhat Bapat) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

"शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना जर शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र मिळालं तर शिवसेनेचे कायदेशीर गटनेते हे एकनाथ शिंदे समजले जातील, असे झाल्यास कायद्यानुसार शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची समजली जाईल," असे उल्हास बापट यांनी सांगितले.

"एकनाथ शिंदे ३७ आमदारांना घेऊन बाहेर पडले आहेत, त्यांच्याकडे जर दोन तृतीयांश संख्याबळ झाले तर त्यांच्यावर पक्षांतर कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार नाही. त्यांनी जर ३७ आमदारांना राज्यपालांसमोर उभे केले आणि भाजपचे सदस्यांचा पाठिंबा घेतला तर, राज्यपाल हे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाचारण करु शकतात, पण मला वाटतं की फडणवीस असे करणार नाहीत, कारण 'दोन वर्ष मुख्यमंत्री राहण्यापेक्षा मी मध्यवर्ती निवडणुकीला सामोरे जाऊन स्वःबळावर निवडून येईल,'असे फडणवीस राज्यपालांना सांगतील,"

"दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक तृतीयांश संख्याबळ राहिले, आणि त्यांनी राजीनामा दिला नाही, तर त्यांच्यावर अधिवेशनात अविश्वासाचा ठराव मांडला जाईल," असे बापट यांनी स्पष्ट केलं.

"राज्यपाल जरी आजारी असले तरी ते रुग्णालयातून आपला कामकाज पाहू शकतात आणि तिथूनच बहुमत असलेल्या पक्षाला सत्तास्थापनेच्या सूचना देखील देऊ शकतात, एका राज्याच्या राज्यपालांना दुसऱ्या राज्याच्या राज्यपालांना आपले अधिकार तात्पुरते देता येत नाही. राज्यपालाची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असल्याने राष्ट्रपती एखाद्या राज्यपालाला तसे अधिकार देऊ शकतात," असे उल्हास बापट यांनी सांगितले.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक ट्वीट केले आहे. या ट्विटची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. संजय राऊत यांचे विधानसभा बरखास्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे बंड महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. संजय राऊत यांनी ट्वीटरवरून बरखास्तीचे संकेत देताना म्हटले आहे, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT