Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Raj Thackeray File Photo
मुंबई

"लाव रे तो व्हिडीओ" : राज ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचे 'मनसे' स्टाईल उत्तर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्ष कधी ठरले? मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना काय शासन देणार, असा सवाल त्यांनी केला. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनाला (Shivsena) कुठलाही शब्द देण्याबाबत आला नव्हता हे भाजपच्या नेत्यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. हाच मुद्दा पकडत राज ठाकरे यांनी शिवसेनाला लक्ष्य केले.

राज ठाकरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला. तेव्हा ते म्हणाले अडीच अडीच वर्षे ठरली होती. मग महाराष्ट्रात सभा झाल्या तेव्हा कधी बोलले का नाही. इथे मुंबईत मोदी यांची सभा झाली, तेव्हा व्यासपीठावर होतात तेव्हा का बोलला नाहीत. मोदी-शहा हे दोघे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. तेव्हाही का बोलले नाही? निवडणुकीचा निकाल लागल्यावर सरकार आपल्यामुळे अडचणीत येऊ शकते हे लक्षात आले. तेव्हा अडीच वर्षाचा विषय काढला. असा आरोपही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

मात्र राज ठाकरे यांच्या याच टीकेला शिवसेनेने 'मनसे' स्टाईलमध्येच उत्तर दिले आहे. शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा १९ फेब्रुवारी २०१९ चा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजप-शिवसेना युतीच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत शिवसैनिकांशी संवाद साधताना दिसत आहेत. यात त्यांनी शिवसैनिकांशी बोलताना स्पष्ट केले होते की आता मुख्यमंत्री पद आणि इतर सत्ता-जबाबदाऱ्या यांचे समान वाटप करण्यात येणार आहे. ज्याच्या जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री हे धोरण आपण स्विकारलेले नाही, हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे, असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

नक्की काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

काल जो काही आपण निर्णय घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण लोकसभेच्या २२ जागा लढत होतो. त्याच्यामध्ये आणखी १ वाढवून घेतली आहे. त्याच्यानंतर जे मुद्दे आपण उचलले होते, त्याचा निकाल आपण लावलेला आहे. मग तो शेतकऱ्यांचा असेल, आपल्या ५०० फुटांचा आहे. नाणारचा मुद्दा आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले आहेत त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला का? समान जागा आणि जबाबदाऱ्याचं, अधिकाराचं समान वाटप. याचा अर्थ, मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे. आधी २५ वर्षे आपण जे करत होतो की, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री ते मी स्विकारलेलं नाही. आपलं जे स्वप्न आहे, आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे.

या सगळ्या गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण युद्धात जिंकलो आणि तहात हारलो. मला माहित नाही. तहात जिंकलो की हारलो तुम्ही ठरवायचं आहे. हा जर कालचा आपला तह असेल तहात हारलो की जिंकलोय. पुढची जबाबदारी तुमची आहे. मी अर्थातच शिवसेना प्रमुखांचं पूत्र म्हटल्यानंतर जे काही मी करीन माझ्या शिवसैनिकांच्या हिताचं करीन. याच्यामध्ये मी माझा कधीही स्वार्थ बघितलेला नाही, आणि बघणार नाही. शिवसैनिकांच्या आयुष्यात किती वर्ष संघर्ष संघर्ष करत बसायचं, करायला लावायचं. मी लढ म्हटलं तर तुमची लढायची तयारी आहे, तुमच्या सगळ्यांची... तुमच्या भरवशावरच मी जे काही करतोय ते करणार आहे. म्हणून हा विश्वास हा प्रेम असंच ठेवा आणि तुमच्या भरवशावरच मी शिवसेना आणि महाराष्ट्राला पुढं घेऊन जातो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT