Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' पत्रकारपरिषदेतील विधानं निवडणूक आयोग तपासणार; कारवाई होणार?

Mayur Ratnaparkhe

Election Commission News : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्पे झाले आहेत, तर 25 मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तत्पुर्वी महाराष्ट्रातील मतदान पाच टप्प्यांमध्ये पार पडले. या कालावधीत निवडणूक प्रचारसभामध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आणि स्टार प्रचारकांनी विरोधकांवर जोरदार टीका केल्याचे दिसून आले. काहींनी तर टीकेचा कळस गाठला होता, यामुळे एकूणच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनताही या लोकप्रतिनिधींबाबत आणि बदललेल्या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसून आले.

खरंतर निवडणूक आयोगानेही वारंवार राजकीय पक्षांना मर्यादेत राहून टीका-टिप्पणी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मात्र तरीही अनेकजणांकडून टीका करताना मर्यादा ओलांडल्या गेल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे निवडणूक आयोगाच्या निशाण्यावर आल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीच्या दिवशी उद्धव ठाकरे यांची झालेली पत्रकार परिषद राज्य निवडणूक आयोग तपासून पाहणार आहे. कारण, मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगांना टार्गेट केल्याची भाजपा आमदार आशिष शेलार यांनी तक्रार केली होती. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहे.

आता राज्य निवडणूक आयोग या संदर्भात उद्धव ठाकरे यांची संपुर्ण पत्रकार परिषद तपासून पाहणार आहे. यात वादग्रस्त असल्यास निवडणूक आयोग यावर कारवाई करू शकते.

मतदानाच्या पाचव्या टप्प्याच्या दिवशी मुंबईत सर्वच ठिकाणी अत्यंत संथगतीने मतदान सुरू होते. यावरून बराच गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावरून सरकार आणि निवडणूक आयोगाच्या व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. कित्येक मतदार हे मतदान न करताच घरी परतले होते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी त्याच दिवशी पत्रकारपरिषद घेत निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली होती. हे भाजपचे कारस्थान असल्याचेही म्हटले होते. महाविकास आघाडीला जिथे मतदान होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी जाणूनबुजून मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू आहे असंही ठाकरे म्हणाले होते.

तर मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे कशी काय पत्रकारपरिषद घेऊ शकतात, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला. शिवाय याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करत, उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा शेलारांनी (Ashish Shelar)आरोप केला. तसेच, उद्धव ठाकरेंनी खोटी आणि दिशाभूल करणारी विधानं केलं असल्याचंही शेलार म्हणाले होते.

(Edited By - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT