Devendra Fadanvis
Devendra Fadanvis sarkarnama
मुंबई

स्वतःच बंद पुकारणारे महाविकास आघाडीचे हे ढोंगी सरकार...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडी प्रयोजित आंदोलनामुळे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा समोर आला आहे. स्वतःच बंद पुकारणारे महाविकास आघाडी सरकार हे ढोंगी आहे, अशी घाणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी पुकारलेल्या 'बंद' वर केली आहे.

श्री. फडणवीस म्हणाले, लखीमपूरच्या घटनेमुळे महाराष्ट्र बंद केला. मात्र, महाराष्ट्रातील सरकार अभूतपूर्व अडचणीत असताना शेतकऱ्याला कोणतीही मदत दिली नाही, कर्ज माफी नाही, आपत्तीसाठी मदत देण्याची घोषणा हवेत विरल्या आहे. लखीमपुरच्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला संपूर्ण सहानूभूती आणि सहवेदना आहे. म्हणूनच याचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. आमचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ क्षमतापूर्ण आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील. पण, जनाब राऊत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला. तो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे.

श्री. फडणवीस म्हणाले, घटक पक्षातल्या लोकांना म्हणावं लागलं, भाजप काळात बरी मदत मिळायची. मावळला शेतकऱ्यांवर गोळीबार करणारं हे सरकार आहे, त्यांना हे आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून लोकांना बंद ठेवायला प्रवृत्त केलं जातंय. या सरकारच तसंही नाव, बंद सरकार आहे. कोरोनाकाळात देश उघडत असताना 'महाराष्ट्र बंद' ठेवला गेला.

शेतकऱ्याचा साताबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरती पोहचले नाही. अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेलं आहे. तुमचा हा 'महाराष्ट्र बंद'चा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे आहे. मुळात तुम्हाला काकाचं दु:ख सतावत आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची किड साफ करता आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे कारखाने कवडी मोल भावाने गिळणाऱ्यावरती फास आवळत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना पित्त झाल्यामुळे हा 'महाराष्ट्र बंद'चा देखावा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

इस्टर्न एक्सप्रेस वे वर १० कार्यकर्ते जमून रस्ता रोखून ठेवतात आणि पोलिस बघ्याची भूमिका घेतात. या आंदोलनाला पोलिसांचा ही पाठिंबा आहे का, असा प्रश्न उपस्थित करून फडणवीस म्हणाले, सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद माजवला जातोय. त्यामुळे त्यांना थोडी जरी शरम असेल तर आज शेतकऱ्यांसाठी एखादं घोषित करावं. ढोंगीपणा करायचा आणि मीडिया अटेंशन करायचं. त्यांना मिनीवरच दुःखही नाही. मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला हे जात नाहीत, पालकमंत्री, मुख्यमंत्री कोणीही जात नाहीत. मोदींच्या घोषणेचे पैसे थेट खात्यात जातात.

बेस्टच्या बस काही फोडण्यात आल्या, मग काही बस बंद केल्या, हे सगळं ठरवून केलं जातंयउच्च नाययालयाने याची नोंद घ्यायला हवी. महाविकास आघाडीचे सरकारच वसुली सरकार आहे, त्यामुळे त्यांच्याकडून कितीही वसुली केली तरी तसेच ते वागणार आहेत. पण, तरीही आमची मागणी आहे, त्यांच्याकडून वसुली करायला हवी. महाराष्ट्रात संविधानाची पायमल्लली केली जातेय.

मंत्री मंडळ बैठकीत चर्चा करून 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली जातेय. संवैधानिक व्यवस्थेला इथे पायदळी तुडवत जातंय, असेही त्यांनी नमुद केले. शेतकऱ्यांना शिक्षा सूनवण्याचा अधिकार आपला नाही. पण कोणीही शेतकऱ्यांना चिरडले असेल त्यांना चिरडण्याचा आपल्याला अधिकार नाही, न्यायालय त्याला शिक्षा देईल. आम्ही शांततापूर्ण आंदोलन केलं तरी आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. इथे पोलिसच 'बंद' साठी पुढाकार घेतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT