Vinod Tawde
Vinod Tawde Sarkarnama
मुंबई

BJP Strategy for Lok Sabha : 2024 ची 'स्ट्रेटेजी' ठरली; 'ग्राउंड बेस' अन् नेतृत्वाचा 'फेस' महत्वाचा ठरणार !

सरकारनामा ब्युरो

BJP Politics : महाराष्ट्राच्या राजकारणापासून सुमारे चार वर्षे दूर राहिलेल्या विनोद तावडे यांची भाजपने राष्ट्रीय सरचिटणीस पदी निवड केली. त्यानंतर त्यांच्यावर २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीची मोठी जबाबदारीही दिली. त्यानुसार तावडे यांनी काम सुरू केले आहे.

भाजप आगामी लोकसभा निवडणूक कशा पद्धतीने लढविणार, त्यासाठी कसे सूक्ष्म नियोजन केले जात आहे, केंद्रीय मंत्र्यांसह बुथ कार्यकर्त्यांवर कोणती जबाबदारी दिली जाते याबाबत माहिती दिली. तसेच ग्राऊंडचा 'बेस' आणि नेतृत्वाचा 'फेस' यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांच्याभोवतीच लोकसभा रंगणार असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.

तावडे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी २०२४ ची तयारी सुरू झाल्याचे सांगितले. तसेच कोणत्या जागांवर भाजपला लक्ष देण्याची गरज आहे, याबाबतही माहिती दिली. तावडे म्हणाले, "भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, (J.P. Nadda) अमित शाह (Amit Shah), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे निवडणुकीची वर्षभर आधीच तयारीचे नियोजन करतात. गेल्या वेळी भाजपने लोकसभेच्या ३०३ जागा जिंकल्या आहेत. त्याखालच्या १६० अशा लोकसभेच्या जागा आहेत तेथे नीट ताकद लागली असती तर भाजपला आणखी ५०-६० जागा जिंकता आल्या असत्या."

देशात अनेक राज्यात भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. ते आव्हान कसे मोडायचे याबाबतही नियोजन केल्याचे तावडेंनी सांगितले. तावडे म्हणाले, " अनेक राज्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत, त्यानुसार राज्याराज्याचे नियोजन केले जाईल. आता महाराष्ट्र (Maharashra), बिहारमध्ये (Bihar) सरकार बदलले. तेलंगणातील राजकीय वातावरण वेगळेच आहे. तेथे नीट ताकद लावली तर चित्र बदलेल. त्यासाठी ४० केंद्रीय मंत्र्यांना बरोबर घेऊन भाजपने लोकसभा प्रवास योजना (BJP) सुरू केली आहे."

लोकप्रवास योजना काय आहे, याचीही तावडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "लोकसभा प्रवास योजनेसाठी ४० केंद्रीय मंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून बूथ ते राज्याचा नेता यांच्यात सांगड घालण्यात येते. तसेच संबंधित राज्याचा राजकीदृष्ट्या कोणता मुद्दा पुढे आणायचा, कोणता नाही, तो लोकांपर्यंत कसा पोहचवायचा याबाबत दिशा ठरविली जाते."

या लोकसभा प्रवास योजनेतून प्रामुख्याने जिंकलेल्या ३०३ आणि दुसऱ्या क्रमांकाच्या १६० जागांबाबत नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी संबंधित राज्यातील नेत्यांशी चर्चा केली जाईल. तेथे गेल्या पाच वर्षांत बदलेली स्थिती लक्षात घेता राजकीय 'स्ट्रॅटेजी' बनवली जाईल. त्यास सध्याच्या खासदारांनी केलेल्या कामाची जोड द्यायची, असे सूक्ष्म नियोजन करण्यात येईल. त्यावर बारा महिने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सतत काम सुरू ठेवणार असल्याचेही तावडेंनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. ते कसे मोडणार याचे गणितच तावडे यांनी मांडले. तावडे म्हणाले, "सर्वेक्षण स्थितीनुसार बदलतात. २०१४ मध्ये सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यावेळी भाजपला २९ टक्के, शिवसेनेला १९, काँग्रेसला १८ तर राष्ट्रवादीला १७ टक्के मते मिळाली होती. शिवसेनेच्या मतातील १० टक्के मते ही हिंदुत्वाच्या मुद्द्याची होता. आता त्यांनी काँग्रेसशी घरोबा केला आहे. ती मते शिंदे-फडणवीस सरकामुळे भाजपला मिळतील. तसेच गरीब कल्याण योजनांमुळे पाच टक्के आणखी मते वाढतील. त्यामुळे भाजपची एकूण मते ४५ टक्क्यांवर जाईल."

यावेळी तावडेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "बाळासाहेबांनी पहिल्यांदा हिंदुत्व राजकारणात आणले. त्यापूर्वी ते संघटनांच्या स्तरावर होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भाजप-शिवसेना (ठाकरे) युती झाली होती मात्र, ती तुटली. बाळासाहेबांच्याच मुलाने हिंदुत्वाच्या विरोध करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीशी हात मिळविणी केली. ते हिंदुत्वविरोधी विचारधारा असणाऱ्यांसोबत कसे बसतात? हे जुन्या शिवसैनिकांनाही पटलेले नाहीत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT