CM Eknath Shinde News :
CM Eknath Shinde News : Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची आमदारकी गेली तरी मुख्यमंत्रीपदावर तेच राहू शकतात? राहुल नार्वेकरांचे सूचक वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Supreme Court News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालायने राखीव ठेवला आहे. तो निकाल कधीही येवू शकतो. त्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक विधान केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आला तर ते मुख्यमंत्रीपदावर राहू शकतील का? असा प्रश्न नार्वेकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर नार्वेकर म्हणाले, ''हा जर तरचा विषय आहे. परंतू, आपल्याकडे यापूर्वी अनेक मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत, जे विधीमंडळाचे सदस्य नव्हते. परंतू मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. पण मला वाटते की या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्याची आपल्याला काहीच गरज नाही. या सगळ्या गोष्टींना अजून बराच वेळ आहे.''

दरम्यान, केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी नुकतीच राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची मुंबईत भेट घेतली होती. किरेन रिजिजू आणि राहुल नार्वेकर यांची विधानभवनात बंद दाराआड चर्चा झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाचे काय-काय कायदेशीर पडसाद उमटू शकतात, सरकार टिकवण्यासाठी काय करता येईल, अशा मुद्यांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रिजिजू आणि नार्वेकर यांच्यातल्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत याबद्दल भाष्य केले होते. नार्वेकर भेटीसंदर्भात म्हणाले होते, किरेन रिजिजू एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. त्यामुळे मी त्यांना चहापानासाठी बोलावले होते. दोघांमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

मात्र, या संपूर्ण घडामोडी पाहता आणि राहुल नार्वेकर यांनी केलेल्या सूचक विधानावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. एकनाथ शिंदे हे अपात्र ठरले तरीही ते विधान परिषदेवर जाऊ शकतात. विधान परिषदेवर आमदार म्हणून जाऊन तेच मुख्यमंत्री राहू शकतात, अशी चर्चा भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत गोटात सुरु आहे.

पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत आमदार अपात्र झाले तर त्यांना लगेच निवडणूक लढवता येवू शकते. इतर राज्यात अपात्र झालेल्या आमदारांनी पुन्हा निवडणूक लढवली आहे. त्यामध्ये ते निवडूनही आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे यांनाच मुख्यमंत्री पदावर कायम ठेवण्यासाठी भाजपचा प्लॅन बी तयार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये शिंदे विधान परिषदेवर जाऊ शकतात, त्यामुळे शिंदेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार नाही, अशी शक्यता अनेक घटनातज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे १६ आमदारांचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे गेले तर या प्रकरणावर अध्यक्षांच्या समोर सुनावणी होईल, त्या सुनावणीमध्ये आणि त्यांनी निकाल देण्यावर कोणतेही कायदेशीर बंधंन नाही, त्यामुळे या प्रकरणात वेळ जाईल, असे सांगितले जात आहे. त्या संदर्भात नार्वेकर यांनी सूचक भाष्य केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT