BJP Vs ShivsenaUBT Sarkarnama
मुंबई

BJP Vs ShivsenaUBT : ''... म्हणून 27 जुलै 'आंतरराष्ट्रीय देशद्रोही दिन' घोषित करा!''; 'या' भाजप नेत्याची युनोकडे मागणी

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : शिवसेनेतील बंडाळीला आज (दि.२०) वर्ष पू्र्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटावर बोचरी टीका करतानाच २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून घोषित करा अशी मागणी करणारं पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत युनोकडे केली आहे. याच मागणीवरुन आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाला डिवचत २७ जुलै हा 'देशद्रोही दिन' म्हणून घोषित करण्याची मागणी युनोकडे केली आहे. यावरुन आता ठाकरे गट आणि भाजपमध्ये नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी २० जूनला एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यामुळे ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तसेच महाविकास आघाडी सरकारही कोसळले. तेव्हापासून आजतागायत ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातून विस्तवही जात नाही. दसरा मेळाव्यापाठोपाठ शिवसेनेच्या वर्धापन दिनाचेही दोन कार्यक्रम पार पाडले.

यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 20 जून हा 'जागतिक गद्दार दिन' म्हणून घोषित करण्याची मागणी संयुक्त राष्ट्र संघाकडे केली. त्यासंदर्भात युनोला पत्रही लिहिले आहे. याचवरुन आता भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) यांनीही संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहिले आहे. शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख यांचा वाढदिवस असतो. मात्र, तो दिवस ' आंतरराष्ट्रीय देशद्रोही दिवस' म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी राणे यांनी यावेळी युनोकडे पत्राद्वारे केली आहे. या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना गद्दार दिवस साजरा करत आहे. खासदार सुप्रिया सुळे देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

नितेश राणे काय म्हणाले ?

आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे. राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या विचारसरणीशी गद्दारी केली, हिंदुत्वाशी गद्दारी केली, मराठीचा विश्वासघात केला. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला देखील फसवले आहे.त्यामुळे 27 जुलै हा दिवस "आंतरराष्ट्रीय देशद्रोही दिन" म्हणून घोषित करावा. संयुक्त राष्ट्र माझी विनंती विचारात घेईन असा विश्वासही आमदार राणे यांनी व्यक्त केला आहे. यासंबंधी राणे यांनीही संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहिलं आहे.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना बाळासाहेब कधी कळले होते का? असा सवाल उपस्थित करताना राणे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे खरे देशद्रोही आहेत. त्यांनी स्वतःच्या वडिलांसोबत गद्दारी केली आहे. मराठी माणूस, हिंदू धर्माशी त्यांनी बेईमानी केली. ज्या भाजपने उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांना सांभाळलं. हिंदुत्वाच्या मुद्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली युती उद्धव ठाकरे यांनी तोडली. मुख्यमंत्रीपदाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षीमुळे त्यांनी ही युती तोडली. त्यांनी देश, मराठी माणूस यांच्यासोबत द्रोह केल्याची घणाघाती टीकाही आमदार नितेश राणे यांनी यावेळी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT