Shiv Sena UBT News : महापालिकेची निवडणूक म्हणजे शिवसेनेसाठी (उध्दव ठाकरे) अस्तित्वाची लढाई ठरली आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता स्वतः मैदानात उतरून ‘मातोश्री’वरून सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 72 तासांत त्यांनी मुंबईतील प्रत्येक प्रभागाचा वैयक्तिक आढावा घेत एक हजारांपेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांशी थेट संवाद साधल्याचे शिवसेनेच्या (ठाकरे) एका नेत्याने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर बदललेली राजकीय समीकरणे पाहता, ही निवडणूक सोपी नाही याची जाणीव ठाकरेंना आहे. त्यामुळेच त्यांनी मुंबईच्या 227 प्रभागांवर लक्ष केंद्रित केले आहे. शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि इच्छुकांशी स्वतः उद्धव ठाकरेंनी चर्चा केली. स्थानिक गणिते लक्षात घेत प्रत्येक प्रभागातील जातीय समीकरणे, विरोधकांची ताकद आणि स्थानिक जनमत याचा कानोसा घेण्यात आला.
एकेका प्रभागातून आठ ते दहा इच्छुक उमेदवार असल्याने पक्षात बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. हे संकट टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतः मैदानात उतरून गेल्या तीन दिवसांत एक हजारांहून अधिक इच्छुक उमेदवारांसह महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. ‘मातोश्री’वर बोलावून प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतल्यामुळे इच्छुकांमधील नाराजी दूर करण्यात त्यांना यश आले आहे. 227 उमेदवारांची यादी तयार असूनही फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी ठाकरेंनी ही नावे गुलदस्तात ठेवली आहेत. स्वतः पक्षप्रमुखांनी जातीने लक्ष घातल्याने कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने सर्व 227 जागांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे; मात्र ही यादी सध्या जाहीर केली जाणार नाही. उमेदवारी लवकर जाहीर केल्यास नाराज उमेदवार शिवसेना किंवा भाजपकडे जाण्याची भीती आहे. ‘वेट अँड वॉच’चे धोरण ठेवून शेवटच्या क्षणी अर्ज भरण्याची रणनीती आखली जाऊ शकते, जेणेकरून विरोधकांना फोडाफोडीसाठी वेळ मिळणार नाही.
मुंबईच्या राजकारणातील सर्वांत मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युती होय. लवकरच दोन्ही बंधू एकत्र येऊन युतीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची ‘मराठी कार्ड’ची ताकद आणि उद्धव ठाकरेंची संघटनात्मक बांधणी एकत्र आल्यास महायुतीसमोर मोठे आव्हान उभे ठाकू शकते.
काँग्रेसने (Congress) मुंबईत ठाकरेंची साथ सोडत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याने आता ठाकरे यांनी नवीन समीकरणे उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महायुतीचा सामना करण्यासाठी त्यांनी राज ठाकरेंच्या मनसेला (MNS) हाताशी धरले आहे. त्यामुळे मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.