uddhav thackeray.jpg sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : "भाजप कार्यकर्ते असतील, तर निबंध लिहून सोडणार का?" बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा संताप

Akshay Sabale

Badlapur School Students Molestation Case : मुंबईतील बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यानंतर बदलापूर येथील संबंधित शाळेची तोडफोड करण्यात आली असून संतापलेल्या जमावानं रेल्वे स्टेशन येथे दगडफेक केली आहे.

याच प्रकरणावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी गुन्हेगारांवर फास्ट ट्रॅक न्यायालयातून केस चालवून शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच, 'शक्ती' विधेयकाची 'शक्ती' गुन्हेगारांना दाखविण्याची जबाबदारी गद्दारी करून सरकार पाडणाऱ्यांची आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. ते 'मातोश्री' येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, "देशात अशा घटना हल्ली वारंवार घडत आहेत. ठराविक राज्यातील ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं, अशी पद्धत आपल्याकडे सुरू झाली आहे. एकाबाजूला आपण 'लाडकी बहीण' योजना आणत असताना बहीणींसह राज्यातील छोट्या-छोट्या मुली असुरक्षित आहेत. मुलींवर अत्याचार होत आहेत. मात्र, देशात कुठेही अशी घटना होता कामा नये. अशा घटनेतील गुन्हेगारांवर 'फास्ट ट्रॅक' कोर्टात केस चालवून शिक्षा व्हावी."

"एखाद्या महिलेवर अत्याचार करणारे गुन्हेगार जबाबदार असतात. त्याचप्रमाणे त्या प्रकरणाचा न्यायनिवाडा करून शिक्षेची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजे. तरच अशा घटनांना आळा बसेल. हाथरस, उन्नाव आणि आता बदलापूरमध्ये ही घटना घडली आहे. मात्र, कुठेही घटना घडली, तरी गुन्हेगार सुटता कामा नये. पक्ष, भेद, भाव विसरून एकत्र झालो, तरच देशातील आणि राज्यातील महिला सुरक्षित राहतील. तेव्हाच आपण 'लाडकी बहीण' आहे, असं म्हणू शकतो," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

"आमचं सरकार 'शक्ती' विधेयक आणू शकत होते. त्याचा मसुदा तयार झाला होता. पण, हे विधेयक आणू शकलो नाही, कारण आमचं सरकार गद्दारी करून पाडलं गेलं. मात्र, 'शक्ती' विधेयकाची 'शक्ती' गुन्हेगारांना दाखविण्याची जबाबदारी गद्दारी करून सरकार पाडणाऱ्यांची आहे," असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला.

"बदलापूरमधील शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित होती, अशी माहिती मिळत आहे. मला राजकारण करायचं नाही. अन्य कुणीही राजकारण करू नये. यात कोणत्याही पक्षाचा अर्थात भाजपचा जरी असला, तरी विनाविलंब कारवाई झाली पाहिजे. वरळीत मिहीर शहाने महिलेला फरपटत नेलं. या प्रकरणाचं पुढे काय झालं? की त्याच्याकडून निबंध लिहून घेतला? बदलापुरातील प्रकरणात भाजप कार्यकर्ते असतील, तर त्यांच्याकडून निबंध लिहून घेऊन सोडून देणार आहात का?" असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT