Hitendra Thakur | Sneha Pandit Sarkarnama
मुंबई

Vasai-Virar Politics : घरातून तिन्ही आमदार वजा; हितेंद्र ठाकूरांच्या अस्तित्वाची लढाई... वसई - विरारला भाजपने चहुबाजूंनी घेरलंय!

Hitendra Thakur | Sneha Pandit : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांचा पराभव करत भाजप-शिवसेनेने हितेंद्र ठाकूर यांना जोरदार धक्का दिला.

Hrishikesh Nalagune

Bahujan Vikas Aaghadi : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांचा पराभव करत भाजप-शिवसेनेने हितेंद्र ठाकूर यांना जोरदार धक्का दिला. आता बहुजन विकास आघाडीची महापालिकेतील अनेक वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपने डावपेच आखले आहेत. त्यामुळे हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या चिरंजीवापुढे अस्तित्व राखण्याचेच आव्हान उभे राहिले आहे.

गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघातून भाजपचे हेमंत सावरा विजयी झाले. केवळ विजयीच झाले नाहीत, तर बहुजन विकास आघाडीला भाजप-शिवसेना युतीने पाणी पाजले. बविआ तिसऱ्या नंबरवर फेकला गेला. शिवाय बविआचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वसईतून जवळपास 10 हजार, नालासोपार्‍यातून 57 हजार आणि बोईसर मधून 39 हजार मतांची आघाडी घेतली.

त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर बहुजन विकास आघाडीचा सर्वात दारूण पराभव झाला. पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांचा वसईतून भाजपच्या स्नेहा पंडित यांनी पराभव केला. तर पुत्र क्षितिज ठाकूर यांना नालासोपाऱ्यातून राजन नाईक यांनी धूळ चारली. बोईसरमध्ये गतवेळी संतोष जनाठे यांच्या बंडखोरीमुळे थोडक्यात वाचलेल्या बविआच्या राजेश पाटील यांना यंदा शिवसेनेच्या विलास तरे यांनी घरी बसवले. या तिन्ही जागा हातून गेल्याने बविआला मोठा झटका बसला आहे.

त्याचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजप आणि शिवसेनेचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. आता हे दोन्ही पक्ष हितेंद्र ठाकूर यांची महापालिकेतील जवळपास 35 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सज्ज झाले आहेत. याच रणनीतीचा भाग म्हणून माजी आमदार विवेक पंडित सक्रिय झाले आहेत. त्यांच्या श्रमजीवी संघटनेने महापालिकेत शिरकाव केला आहे.

आमदार राजन नाईक आणि आमदार स्नेहा पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून इथे फिल्डिंग लावली आहे. निधीसाठी त्यांनी हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात इथले प्रश्न लावून धरले होते. आढावा बैठक घेऊन पालिकेतील प्रशासनावर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे बविआ बॅकफूटवर गेलेला पहायला मिळत आहे.

वसई-विरार महापालिकेची शेवटची निवडणूक 2015 मध्ये झाली होती. यात 115 पैकी तब्बल 105 जागा जिंकत ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले होते. पण आता ठाकूर यांच्या पक्षातून तिन्ही आमदा वजा झाले आहेत. शिवाय भाजप आणि शिवसेनेची पकड दिवसेंदिवस घट्ट होत आहे. अशात महापालिकाही हातून गेली तर पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात येईल.

आता बविआने आपल्या दिग्गज आणि वरिष्ठ नेत्यांना महापालिकेत उतरविण्याची तयारी केली आहे. कार्यकर्त्यांनाही लोकांशी तुटलेली नाळ पुन्हा जोडून लोकांमध्ये जाण्यासाठी कार्यक्रम आखण्याचे आदेश ठाकूर यांनी दिले आहेत. मतदारांनी राष्ट्रीय पक्ष बघून लोकसभा आणि विधानसभेला मतदान केले होते. पण महापालिकेला व्यक्ती पाहून मतदान केले जाईल असा पक्षाला विश्वास आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT