Eknath Shinde, Devendra Fadnavis,
Eknath Khadse
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Eknath Khadse  Sarkarnama
मुंबई

Politics : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडतोय? खडसेंनी सांगितलं कारण

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सात महिने उलटले आहेत. मात्र, तरी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. फक्त 18 मंत्री सध्या सरकार चालवत आहेत. यावरूनच शिंदे-फडणवीस सरकारवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी टीका करत मंत्रिमंडळाचा विस्तार नेमकी का लांबत आहे, याचे कारणच सांगितले आहे.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, ''सध्या 18 मंत्री सरकार चालवत आहेत. मात्र, वास्तविक सत्ताधारी पक्षातील प्रत्येक आमदाराला मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची इच्छा आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की आपोआप असंतोष उफाळून येईल. त्या असंतोषाला तोंड देणं कठीण होईल, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही'', असं ते म्हणाले.

कल्याण येथील एका कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे हे उपस्थित होते. यावेळी शिंदे व फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडत आहे, याविषयी खडसे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी हे भाष्य केलं.

खडसे म्हणाले, ''18 मंत्री राज्याचा कारभार पाहत असल्यामुळे योग्य तो निर्णय होऊ शकत नाही. जनसंपर्क कमी पडतोय. भाजपमधील अनेक आमदार व शिंदे गटातील आमदार मंत्रीमंडळात यायला इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला मंत्री मंडळात घ्यायचे हा पेच असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही'', असे ते म्हणाले.

आंबेडकर आणि ठाकरे युती विषयी खडसे म्हणाले, ''प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात युती झाली. मात्र, याबाबत युतीचा प्रस्ताव किंवा कुठलेही बोलणे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झाले नाही. तसा प्रस्ताव देखील आला नसल्याचे शरद पवार यांनी कालच सांगितलं आहे. प्रस्ताव आल्यानंतर वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील'', असे खडसे यांनी स्पष्ट केले.

सी सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 40 जागा मिळतील असा दावा करण्यात येत आहे, याविषयी बोलताना खडसे म्हणाले, ''हा सर्व्हे सत्य परिस्थितीवर आधारित अशा स्वरूपाचा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता सरकार अस्थिर आहे. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय लागतो यावर ते सरकार अवलंबून आहे. त्याची टांगती तलवार या सरकारवर आहे. सरकार नावाला चालले असून सरकारमध्ये समन्वय नाही'', असं ते म्हणाले.

''मुळात राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार उत्तम काम करत असताना निव्वळ सत्तेच्या लालसेपोटी हे सरकार स्थापन झालं. एका पक्षाला फोडणे, पूर्ण पक्षाला एकत्र घेणे आणि त्या माध्यमातून हे सरकार स्थापन झालं. अलीकडे राज्यात महागाई बेरोजगारी हे प्रश्न आहेत, इंडस्ट्रीज महाराष्ट्राच्या बाहेर जातात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाहीये. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

''महाराष्ट्रावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या मधला सर्वात मोठा भाग 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज किंवा हमी या सात महिन्यांचा काळात दिली आहे. विविध विकास कामाबद्दल हे कर्ज किंवा हमी आहे त्याबद्दल दुमत नाही. मात्र राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतोय.

एकंदरीत सर्व स्थिती पाहता सर्वसामान्य माणूस प्रत्यक्ष स्थिती अनुभवतोय की त्याला त्याचा फारसा काही लाभ होत नाही. त्यामुळे या सरकारचा विरोधात मतदान करेल, अशा स्वरूपाचा संकेत या सी सर्वेच्या माध्यमातून दिला जातोय आणि मला वाटतं अलीकडचा कालखंडात राज्याची स्थिती आहे त्याचे प्रतिबिंब या सर्वेत दिसतेय'', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

''लव्ह जिहादच्या विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन देशभरात केले जात आहे. लव्ह जिहाद होऊच नये, अशा प्रकारला विरोध केलाच पाहिजे, अशी भूमिका समजात नेहमीच राहिली आहे. परंतु एका विशिष्ठ पक्षाच्या किंवा गटाच्या माध्यमातून मोर्चे काढले जात आहेत.

जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसे जनआक्रोश मोर्चे, धर्माच्या संदर्भातील अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. यामुळे नागरिकांच्या मनात हिंदूत्व जागृत करणे आणि मतदार पेटीत लाभ मिळवणे हा राजकीय पक्षाचा हेतू असू शकतो'', असे वक्तव्य खडसे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT