नगर : ''नाईट लाईफचा गैरअर्थ घेऊ नये. पब, बार, मौजमजा असा त्याचा अर्थ नाही. तर रात्रपाळीला काम करणाऱ्या लोकांना चांगले जेवण मिळावे, त्यांना सुविधा मिळाव्यात, म्हणून तयार केलेली व्यवस्था आहे. मुंबई हे न झोपणारे शहर आहे, त्यामुळे या शहराला ती गरज आहे,'' असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करीत मुंबईच्या 'नाईट लाईफ'ला हिरवा कंदिल दिला.
मुंबई येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. त्या वेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. मुंबईतील नाईट लाईफबाबत आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या भुमिकेबाबत मुख्यमंत्री म्हणाले, ''याबाबत विरोधक टीकाही करीत असतील, परंतु त्यांनी नाईटलाईफ चा अर्थ समजावून घ्यायला हवा. नाईट लाईफ मधील 'लाईफ' हा शब्द महत्त्वाचा आहे. लाईफ म्हणजे जीवन. मुंबई हे न झोपणारं शहर आहे. मुंबईकर दिवसा व रात्रीही कष्ट करतात. नाईटलाईफचा अर्थ पब, बार, मौजमजा, छंद असे नाही, तर रात्री कष्ट करणाऱ्या लोकांना योग्य त्या सुविधा मिळाव्यात, रात्रीही भोजनालये सुरू असायला हवीत. त्यांना आवश्यक असणारे जेवण उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यांना रितसर कुटुंबामवेत जाऊन जेवण करता आले पाहिजे. थोडक्यात मुंबईत चोवीस तास सेवा, असा त्याचा अर्थ होतो. पोलिस यंत्रणेवर ताण येत असल्याचे कोणी म्हणत असेल, तर पोलिस रात्री जागेच असतात. ते जागे असतात म्हणूनच आपण झोपू शकतो,'' असे ठाकरे यांनी सांगत या विषयाचे समर्थन केले.
घरांच्या बाबतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. ते म्हणाले, ''मुंबईकरांना हक्काची घरे मिळावेत, हे शिवसेनेचे अनेक वर्षे स्वप्न होते. त्याबाबत मी कालच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. ही सर्व कामे पैशाअभावी अडलेली आहेत. मुंबईतील प्रकल्पांत बरीच गुंतागुंत आहे. ती गुंतागुंत आधी सोडविणार आहे. त्यामध्ये काही आर्थिक संस्था मदतीसाठी इच्छुक आहेत, मात्र त्यामधील गुंतागुंत सोडवून द्या, असे ते म्हणतात. त्यामुळे ती गुंतागुंत सोडवू मग त्यामध्ये गुंतवणूक करणार आहोत. अनेक प्रकल्पांना मुंबईकर स्वतःची राहती घरे देऊन बसला आहे. परंतु ती वेळेत पूर्ण होत नसल्याने भाड्याच्या घरात राहण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. त्यामुळे पुनर्निर्माणचा प्रश्न मार्गी लावून लवकरच मुंबईकरांना हक्काची घरे देण्यासाठी नियोजन करीत आहोत,''
महाराष्ट्रात शिवभोजन थाळीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण मिळत आहे. हा प्रकल्प यशस्वी होत असून, अजूनही लोक अशा सेंटरची मागणी करीत आहेत. मुकेश अंबानींसारखे उद्योजक या प्रकल्पाला मदत करतील, त्यांनी मदत करावी. अशा उद्योजकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
शिवसेनेचे दुसरे स्वप्न म्हणजे एक रुपयांत आरोग्य तपासणी. हा प्रकल्पही लवकरच सुरू होणार आहे. ही योजना तयार आहे. संबंधित चाचण्या सुरू आहेत. लॅबमधील तपासणीतील निष्कर्ष व या प्रकल्पातील निष्कर्ष याबाबत अभ्यास सुरू आहे. या योजनेविषयी अंतीम चाचणी सुरू असून लवकरच महाराष्ट्रातील जनतेला एक रुपयांत आरोग्य तपासणी करता येणार आहे, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.