राहुरी, ता. 11 : "जनता दरबार केवळ देखावा नाही. त्यामधून नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी सर्व विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी जनता दरबारात उपस्थित राहिले पाहिजे. जनतेच्या समस्या समजून घेऊन, त्यावर तातडीने कार्यवाही केली पाहिजे. जनता दरबारातील नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
राहुरी येथे मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या कार्यालयात "जनता दरबार'चे आयोजन केले होते. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष श्यामराव निमसे, राहुरी पालिकेतील विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, संचालक विजय डौले, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार फसियोद्दीन शेख, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, भूमिअभिलेख उपअधीक्षक डॉ. योगेश थोरात आदी उपस्थित होते.
जनता दरबारात नागरिकांनी विविध समस्यांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्यात वीज, पाणी, रस्ते व महसूल विभागाच्या समस्या सर्वाधिक होत्या. "राज्य वीज मंडळाने आवश्यक तेथे रोहित्र द्यावे. तहसीलदारांनी न्यायप्रविष्ट रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून, रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्य द्यावे,' असे आदेश खासदार डॉ. विखे पाटील यांनी दिले.
राहुरी येथे अंगणवाडीतील मुलांना उबदार स्वेटरचे वाटप खासदार डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवाजी सोनवणे, आर. आर. तनपुरे, विजय डौले, राजेंद्र उंडे, शहाजी ठाकूर, पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास कुरे, प्रफुल्ल शेळके उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.