Congress Party Sarkarnama
नागपूर

Congress Politics : काँग्रेसमध्ये धुसफूस, जिल्हाध्यक्ष बदलामुळे नाराजी

Baba Ashtankar Ashwin Bais : नागपूर काँग्रेसमध्ये झालेल्या जिल्हाध्यक्ष बदलामुळे अंतर्गत धुसफूस वाढली आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात देखील असंतोष वाढला आहे.

Rajesh Charpe

Congress News : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्य काँग्रेसचे अध्यक्ष बाबा आष्टनकर यांना अवघ्या सात महिन्यात बदलण्यात आले. त्यांच्याऐवजी आजवर एकही निवडणूक न लढलेल्या युवकाला जिल्हाध्यक्ष केले. यामुळे काँग्रेसचे सिनिअर नेते दुखावले आहेत. सर्वांचा रोष जिल्ह्याचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर आहे. त्यामुळे पक्षअंतर्गत धुसफूस वाढली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यात केदारांना दोषी ठरवण्यात आले आहे. जेल टाळण्यासाठी त्यांनी भाजपशी तडजोड केल्याचा तर्क लावला जात आहे. ग्रामीण भागातील राजकारण मोठ्या प्रमाणात जाती-पातीवरच अवलंबून असते. जिल्हा परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जात महत्त्वाची मानली जाते. मतदारसंघातील जातीची संख्या बघून सर्वच पक्ष उमेदवारी देत असतात.

विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने जातीय समीकरण पाळले नाही. त्याचा फटका बसला असल्याचे दिसून येते. या उलट भाजप प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देऊन त्यांना आपलेसे करण्याचा बारकाईने प्रयत्न करीत आहे. तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे चंद्रशेखर बाबनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. ते सध्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूलमंत्री आहेत. अलीकडेच भाजपने कार्यकारिणीत बदल केले. नागपूर जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले. दोन्ही जिल्हाध्यक्ष कुणबी समाजाचे केले आहेत. काँग्रेसने आष्टनकर यांना हटवून तेली समाजाला दुखावले आहे. याचा फटका झेडपीच्या निवडणुकीत काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात तत्कालीन जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्याऐवजी बाबा आष्टनकर यांना प्रभारी जिल्हाध्यक्ष करण्यात आले होते. त्यांना नियमित अध्यक्ष करण्याचा शब्दही देण्यात आला होता. मात्र केदार यांनी आष्टनकर यांच्या नावाला विरोध केला. प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन त्यांनी ३१ वर्षांच्या आश्विन बैस यांना जिल्हाध्यक्ष केले. त्यांनी साधी ग्राम पंचायत निवडणूकसुद्धा यापूर्वी लढलेली नाही. जिल्ह्यात अनेक अनुभवी व ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनाही डावलण्यात आले.

बाबा आष्टनकर 1987 पासून युवक काँग्रेसमधून राजकारणात उतरले होते. 10 वर्षे नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य होते. या काळात ते जिल्हा परिषदेत काँग्रेसच गटनेता होता. त्यांच्या पत्नी सुद्धा हिंगणा पंचायत समिती सभापती होत्या. बाबा आष्टनकर यांना अध्यक्ष करून काँग्रेसने जिल्ह्यात तेली-कुणबी समिकरण साधले होते. हे समीकरण घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस उतरणार होती. मात्र केदारांनी हे समीकरण विस्कटून टाकले आहे. नागपूर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातून स्वतः ला वाचविण्यासाठी केदारांनी काँग्रेसचा बळी दिला असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे.

नागपूर जिल्ह्यातील एका विशिष्ट गटाकडे काँग्रेस पक्षाची कमान सोपविल्याने पक्षातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आधीच नाराज आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसलाही आता केदारांवर भरवसा राहिला नाही. केदारांच्या राजकारणामुळे काँग्रेसच नव्हे तर महाविकास आघाडीतही असंतोष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT