नाशिक

महागड्या उपचारांमुळे माणूस जगण्याची आशा सोडतो...त्यासाठी आमचे आरोग्य शिबिर : मुख्यमंत्री 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : "महागड्या उपचार पद्धतीमुळे सामान्य माणूस जगण्याची आशा सोडून देतो. त्यावर उपाय म्हणून प्रत्येकाला उपचाराचा अधिकार मिळवून देण्यासाठी सरकार स्वतः खर्च करुन वैद्यकीय सेवा सामान्यांपर्यंत पोचवत आहे. त्यासाठीच आमचे आरोग्य शिबिर आहे," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. 

सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे दिंडोरी, देवळा, बागलाण, सुरगाणा व कळवण तालुक्‍यातील रुग्णांसाठीच्या अटल ग्रामीण महाआरोग्य शिबिर झाले. त्याचे उद्‌घाटन फडणवीस यांनी केले. यावेळी ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुषमान भारत योजना सुरु केली. ती जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. त्यातंर्गत देशातील 50 कोटी जनतेला 5 लाखापर्यंतच्या उपचाराची सुविधा आहे. राज्य सरकारच्या योजनातंर्गत गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतात. त्यात शक्‍य न झालेल्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपचार केले जातात." 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आदिवासींच्या मुंबईतील महामोर्चाचा उल्लेख केला. वनजमिनीचे पट्टे देण्याचे काम वेगाने सुरु असून चांगल्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. फडणवीस यांच्या हस्ते जनजाती गौरव यात्रेचा शुभारंभ आणि लघुपटाचे उद्‌घाटन झाले. या यात्रेद्वारे सरकारच्या योजना आदिवासी बांधवापर्यंत पोहचतील व या समाजातील थोर व्यक्तींचा आदर्श नव्या पिढीसमोर जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, जे. पी. गावीत, सीमा हिरे, अनिल कदम, महापौर रंजना भानसी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT