Pune University Sarkarnama
नाशिक

Pune University : विद्यापीठाने 100 कोटींचा ताजमहाल बांधला काय?

सरकारनामा ब्यूरो

अरविंद जाधव :

Nashik News : विद्यापीठाने गेल्या वर्षात 100 कोटी रुपये खर्च केलेत. मग यातील थोडे पैसे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रास का मिळाले नाहीत? हा सवाल आहे नाशिकमधील सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांचा... यावरून आक्रमक झालेल्या विद्यार्थी संघटनांनी उपकेंद्राचे बंद पडलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

'विद्यापीठाने 100 कोटी रुपयांमध्ये ताजमहाल (Tajmahal) बांधला काय? असा प्रश्न उपस्थित करीत कुलगुरूंच्या एकंदरीत कारभाराबाबत राज्यपालांना पत्र देण्यात आले आहे. आता याबाबत काय कारवाई होणार, याकडे विद्यार्थी संघटनांचे लक्ष लागले आहे.

नाशिककरांच्या रेट्यामुळे पुणे विद्यापीठाच्या नाशिकच्या उपकेंद्रास राज्य सरकारने मान्यता दिली. कामालाही सुरुवात झाली. पण, कुलगुरू आणि अन्य काही पदाधिकाऱ्यांच्या आपापसांतील मतभेदांमध्ये हे काम बंद पडले. नाशिकच्या उपकेंद्राचा संबंध थेट दोन लाख २५ हजार विद्यार्थ्यांशी आहे. त्याचबरोबर सीएएस समिती स्थापन झाली नसून, प्राध्यापकांच्या वेतनाचाही मुद्दा थंडच असल्याचा आरोप संघटनांच्या प्रतिनिधींनी केला.

सध्याचा कारभार ठेकेदारांच्या भल्यासाठी होत असून, यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला असल्याचा गंभीर आरोपही विद्यार्थी संघटनांनी केला. दरम्यान, कामाच्या दिरंगाईविरोधात संघटनांच्या प्रतिनिधींनी कुलगुरूंचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी अजिंक्य गीते, युवासेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ, माजी शिक्षण मंडळ सदस्य जय कोतवाल, मनविसेचे जिल्हाध्यक्ष मनोज गोवर्धने, छात्रभारतीचे समाधान बागुल, 'आप'चे अभिजित गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्याधर घुगे, वंचित आघाडीचे रवी पगारे, शिवसेनेचे शहरप्रमुख शुभम पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत चौधरी, बाजीराव मते, जिल्हाध्यक्ष गणेश मोरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी नाशिक उपकेंद्राचे समन्वयक संजय सानप यांनाही निवेदन दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यपालांना निवेदन

दरम्यान, विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यवस्थापन समिती सदस्य सागर वैद्य यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. उपकेंद्राच्या कामात दिरंगाई होते आहे. याप्रकरणी आपण राज्यपालांना निवेदन दिले असल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले. मात्र, या उत्तरावर विद्यार्थी प्रतिनिधींचे समाधान झाले नाही. कामास त्वरित सुरुवात झाली नाही तर, सर्व संघटना भीक मांगो आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT