नाशिक

घाबरलो असतो तर घरात बसलो असतो. राज्यभरात मी नव्वद सभा घेतल्यात : छगन भुजबळ

सरकारनामा ब्युरो

नाशिक  :   "आम्ही कोणाला घाबरत नाही. घाबरलो असतो तर घरी बसलो असतो. राज्यभर फिरून नव्वद सभा घेतल्या नसत्या," या शब्दांत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.  भुजबळ नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. माजी खासदार  समीर भुजबळ यांना पक्षाने नाशिकची उमेदवारी जाहीर केली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले.

ते म्हणाले, "शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल दोघेही राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांची मुदत २०२० पर्यंत आहे. ही जागा रिकामी झाल्यावर उगीचच अन्य कोणाला गेली असती. भाजप विरोधकांचे राज्यसभेतील संख्याबळ कमी होऊ नये म्हणून शरद पवार यांनी निवडणूक न लावण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप विरोधी व धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आम्ही खुप प्रयत्न केले. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी आग्रह धरला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर ते अजुन बसले. आम्ही संघाच्या बाजुने नाही. संघाविषयी आम्ही एकत्रित मसुदा करायला तयार होतो. त्यांना चार जागा देण्याची तयारी होती. मात्र, प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यात रस नव्हता अस आमच मत आहे."

"राज्यात आणि नाशिकमध्ये गेल्या साडे चार वर्षात विकास थांबला आहे. भुजबळांना श्रेय मिळू नये म्हणून विकासकामे केली नाहीत. नाशिक बेवारस झालंय. त्याला विचारणार कोणी नाही. जनतेत भाजपविषयी प्रचंड रोष आहे. त्यामुळे यंदा नाशिकच्या दोन्ही जागा आम्ही जिंकू." असाही दावा भुजबळ यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT