Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
नवी मुंबई

`हेवीहेट` एकनाथ शिंदेंना सेनेतूनच दणका? : मर्जीतील अधिकाऱ्याची बदली

संदीप पंडित

वसई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मर्जीतील आयुक्त गंगाधरन डी. यांची बदली केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. वसई विरार महानगरपालिकेत एक हातीअसलेल्या बहुजन विकास आघाडीला शह देण्यासाठी वसई विरार (Vasai Virar Municipal) महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून गंगाधरन डी. (Gangadharan D ) यांची राज्य सरकारकडून नियुक्ती केली होती. या नेमणुकी मागे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची भूमिका होती.

वसई विरार महापालिका निवडणुकीपर्यंत गंगाधरन डी. आयुक्त असतील अशी अटकळ बांधली जात होती. पण, राजकीय मोर्चेबांधणीत गंगाथरन अपात्र ठरले गेल्यानेच त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगितले जाते. ३१ डिसेंबर १९ ला तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या कार्यभार पालघरचे तत्कालीन जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानंतर ८ एप्रिल २० रोजी गंगाथरन डी. यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. नेमक्या त्याचकाळात कोरोनाने कहर केल्याने वसई विरार महापालिकेत प्रशासक म्हणून गंगाथरन डी. यांचीच राज्य सरकारने नियुक्ती केली होती.

आयुक्तांच्या माध्यमातून ठाणे येथूनच महापालिकेचा कारभार सुरु आहे की काय असेच एकंदर चित्र होते. बांधकामातून मिळणारा मलिदा पाहून प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांमध्ये ठाणे तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हस्तक्षेप वाढल्याने गंगाथरन यांची हतबलता अनेकदा दिसून आली होती. बहुजन विकास आघाडीची आर्थिक रसद बंद करण्यासाठी आयुक्तांनी ठेकेदारांच्या बिलांमध्ये कात्री लावायला सुरुवात केली होती ठेकेदारांची बिले रखडून ठेवतानाच बिलात मोठ्या प्रमाणात कपात करण्याचे काम गंगाथरन यांनी केल्याने ठेकेदार लॉबी आर्थिक संकटात सापडली गेली. त्यामुळे बविआला काही प्रमाणात आर्थिक सेटबॅक बसला असला तरी ठेकेदार लॉबी आजही त्यांच्यासोबतच आहे. आयुकानी याठिकाणी आल्यावर ठेकेदारावरील कर्मचार्यांना धक्का देणे असेल किंवा कर्मचारीच्या बदल्या असो आयुक्त सातत्याने वादग्रस्त ठरले होते.

वसई विरारवरील हितेंद्र ठाकूर यांच्या महापालिकेतील सत्तेला हादरा देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीच गंगाथरन डी. यांना आणले गेल्याची चर्चा होती. गंगाथरन यांनी आपल्या वागण्यातून, कामातून त्यावर शिक्कामोर्तबच केले होते. कडक शिस्तीचा बाऊ करत गंगाथरन यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह पत्रकार आणि बविआच्या नेत्यांना थेट भेट न देता आपल्या दालनाबाहेर ठेवण्याचे काम केले. त्याचबरोबर सर्वसामान्यांनाही त्यांनी दूरच ठेवले. दुसरीकडे, शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत मात्र, गंगाथरन यांच्या नियमित बैठका होत होत्या. कधी नव्हे ते शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने मुख्यालयात फिरताना दिसू लागले होते. यावरूनच मनसेच्या बरोबर त्यांचा मोठा वाद हि चांगलाच गाजला होता .

वसई विरारमध्ये गंगाथरन यांच्या माध्यमातून महापालिकेची सत्ता मिळवण्याची मोर्चेबांधणी करण्यात शिवसेनेला अपयश आलेले आहे. तर दुसऱ्या बाजूला या सगळ्याचा लाभ मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित रित्या घेतल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीला याठिकाणी गमावण्यासारखे काहीच नव्हते. उलट सेनेच्या माध्यमातून जे चालले आहे त्याचा लाभा मात्र त्यांनी व्यवस्थित पणे उठवला असून कधी नव्हती ती कामगार संघटना त्यांनी याठिकाणी उभी केली आहे. त्यातच काही महिन्यापासून खासदार,आणि सेनेच्या एका आमदाराचे पालिकेच्या कारभारात होणारा हस्तक्षेप यामुळे आयुक्त बविआचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या जवळ जाऊ लागल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT