Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
पिंपरी चिंचवड

Ajit Pawar यांनी कारणांसह सांगितले.. : महापालिका निवडणुका कधीही होऊ शकतात

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : तीनच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याची तयारी अंतिम टप्यात आली असताना राज्य सरकारने आता ती चार सदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय घेऊन लगेचच तसा अध्यादेशही काढला आहे. त्यामुळे ही निवडणूक २०२३ पर्यंत पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, हा निर्णय व अध्यादेश निघाल्याने न्यायालयात टिकण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही निवडणूक कधीही होऊ शकते, त्यासाठी तयार रहा, असे आवाहन करीत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग आज (ता.८) पिंपरी-चिंचवडमध्ये फुंकले.

निवडणूका लागणार असताना शेवटच्या क्षणी प्रभागरचनेत बदल करण्याचे कारण देत ही प्रक्रिया थांबविण्यास सांगणे हे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका घेण्याच्या दिलेल्या आदेशाचे उल्लंघन आहे, हे जर, कोणी न्यायालयात पटवून दिले,तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रद्द केलेल्या निवडणूका पुन्हा कधीही लागू शकतात. म्हणून गाफील राहू नका, असा इशारा पवार यांनी दिला.

तसेच या निवडणुकीसाठी युती वा आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगतिले.पण,निवडणुकांचा ट्रेण्ड आता बदलला असल्याने महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय सुक्ष्म नियोजन करा,वॉर्डाची बलस्थाने ओळखा, कमकुवत बाजूंचा विचार करा, असा मंत्र त्यांनी दिला. पिंपरी पालिकेत विजय आपला आहे. पण, त्यासाठी कष्ट करा.

कारण संघर्षाशिवाय यश मिळत नाही, असा पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह व्दिगुणित करणारा उपदेशवजा सल्ला त्यांनी `निर्धार महाविजयाचा संवाद कार्यकर्त्यांचा` या पिंपरी-चिंचवडमधील पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या संवाद सभेत दिला. आपली राष्ट्रवादी, आपली पालिका हा मंत्रही त्यांनी यावेळी दिला. राज्यातील सत्तापालटानंतर त्यांची ही पहिलीच शहर भेट होती. त्यामुळे ते काय बोलतात, याकडे लक्ष लागले होते.

नेहमी वेळ पाळणाऱ्या अजितदादांना या सभेसाठी येण्याकरिता अर्धा तास उशीर झाल्याने त्यांनी सुरवातीसच त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. शहरातील पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, समन्वयक व प्रवक्ते योगेश बहल, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, भाऊसाहेब भोईर आदी यावेळी व्यासपीठावर होते.

खंडणी उकळणारे आयपीएएस अधिकारी (पराग मणेरे),पेपर घोटाळ्यातील आयएएस अधिकारी (खोडवेवकर) यांच्यासह चार निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेते घेतल्याबद्दल पवार यांनी राज्य सरकार व त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाड़ून टीका केली. अन्याय करणारे, चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालून त्यांना पुन्हा सेवेत घेणारे कोण हे टिकोजीराव, असे ते म्हणाले.

ते काही मिस्टर इंडिया होऊ शकत नाही. पुन्हा ते दिल्लीला गेले आहेत. आता, तरी त्यांनी स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनासाठी पालकमंत्री द्यावेत (मंत्रीमंडळ स्थापन करावे) असा टोला त्यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही यांना निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत, असे बदललेल्या प्रभाग रचनेवरून दिसते आहे. हे लोकशाहीचा मुडदा पाडण्याचे काम आहे,असा हल्लाबोल त्यांनी केला. फडणवीस हे,तर बिनखात्याचे मंत्री असून त्याचा राज्याला काहीच उपयोग नाही, अशी टीका त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT