Nitin Gadkari - Balasaheb Patil
Nitin Gadkari - Balasaheb Patil Sarkarnama
प्रशासन

बाळासाहेब पाटलांसमोरच गडकरी म्हणाले...‘सहकार आयुक्त असा नंदीदेव असतो की...’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : माझा खात्याला (केंद्रीय रस्ते विभाग) दरवर्षी लाखो-करोडे रुपये लागतात. ते आपल्याच देशातून म्हणजे सहकारी संस्था, पतसंस्था, अर्बन बॅंका व इतरांकडून उभारावा. म्हणजे लोकांनी एनएचआयकडे गुंतवणूक करावी, त्यावर आम्ही सात टक्के परतावा देऊ. पण, सहकार आयुक्त असा नंदीदेव आहे की त्यांच्या सहकाऱ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी लक्ष घालून त्यांना सांगितले तर ते पुढे जातील;अन्यथा ते काही कारणार नाहीत. राज्याच्या सहकार विभागाने सहकारी तसेच अर्बन बॅंका, पतसंस्था व इतर संस्थांना एनएचआयमध्ये गुंतवणूक करायला परवानगी द्यावी, अशी मागणीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली. (Co-operative banks, credit society's should be allowed to invest in NHI : Nitin Gadkari)

महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे वैकुंठभाई मेहता, सर विठ्ठलदास ठाकरसी, प्रा. धनंजय गाडगीळ यांच्या तैलचित्रांचे राज्य सहकारी बॅंकेच्या कार्यालयात अनावरण करण्यात आले. त्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, सहकार क्षेत्राला नवी दृष्टी देण्याची सध्या गरज आहे, त्यासाठी राज्य सहकारी बॅंकेने पुढाकार घ्यावा. केंद्रीय रस्ते विभागाला दरवर्षी लाखो, करोडे रुपये लागतात. त्यासंदर्भात आमच्या विभागातील अधिकाऱ्यांनी परदेशातील पैसा कसा उभारता येईल, ते सांगितले. पण मी त्यास नकार देत आठ दिवसांत पॉलिसी बदलून द्या, असा आदेश दिला. एनएचआय विभागाला लागणारा पैसा देशातील लोकांकडून म्हणजे सहकारी संस्था, पतसंस्था, अर्बन बॅंका व इतरांकडून घ्यावा. म्हणजे लोकांनी एनएचआयकडे गुंतवणूक करावी, त्यावर आम्ही सात टक्के परतावा देऊ. त्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी लक्ष घालून सहकार आयुक्तांना सांगावे. तसेच, कॉर्पोरेट स्टॉक एक्सचेंजला परवागनी द्यावी, असे आवाहनही त्यांनी राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांना केले.

पाणी आणि सहकार क्षेत्रामुळे झालेला बदल याबद्दलचा एक किस्साही गडकरी यांनी या वेळी सांगितला. ते म्हणाले की, राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मी एकदा कऱ्हाडहून सोलापूरला निघालो होतो. हा परिसर मला नवीन होता. माझ्याबरोबर गाडीत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंताही होते. मी त्यांना सांगत होतो की, या गाावांत पाणी पोचले आहे, ज्या गावे दुष्काळी होती, त्या गावांत पाणी पोचले नाही, असे सांगत होतो. सोलापूरमध्ये उतरल्यानंतर त्यांनी मला विचारले की, साहेब एक प्रश्न विचारू का. मी विचारा, असे म्हणालो. त्यावर ते म्हणाले की, पाणी त्या गावांत पोचले की नाही, ते तुम्ही कसे ओळखत होता. मी त्यांना सांगितले की ज्या गावांत बिल्डिंग दिसत होती, दुकानांत आणि रेस्टॉरंटमध्ये गर्दी होती, त्या गावांत पाणी पोचले, असा मी अर्थ काढला आणि ज्या गावांत लोक बिनकामाचे दिसत होते, दुकाने, हॉटेल ओस दिसत होती, तेथे पाणी पोचले नाही, असा त्याचा अर्थ आहे, असे मी त्यांना सांगितले. ते शंभर टक्के खरे ठरले.

आपल्या भागात, गावांत नुसतं पाणी पोचून उपयोग नाही. त्या पाण्याचा उपयोग करून या भागाने कृषी उत्पन्न अडीचपट वाढविले, त्या भागाचा आम्हाला हेवा वाटतो. मी जेव्हा पुण्याहून कोल्हापूरला जातो, तेव्हा या भागातील परिस्थिती बघतो आणि जेव्हा विदर्भात जाऊन परिस्थिती बघतो, तेव्हा त्यातील फरक लक्षात येतो. यामागाचे कारण पाण्यामुळे आलेल्या संपन्नतेमध्ये सहकार चळवळीने आर्थिक भर टाकली, त्यामुळे या भागात कृषी उत्पन्न वाढलेले दिसते. पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्र आज यशस्वी झालेले दिसते आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT