<div class="paragraphs"><p>Shivdeep Lande</p></div>

Shivdeep Lande

 

Sarkarnama

प्रशासन

दबंग आयपीएस शिवदीप लांडेंवर बिहारमध्ये मोठी जबाबदारी

सरकारनामा ब्युरो

पटणा : दबंग आयपीएस (IPS) अधिकारी म्हणून देशात ओळखले जाणारे शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) हे याच महिन्यात पुन्हा बिहार पोलीस दलात रुजू झाले होते. त्यांना सुरवातीला उपमहानिरीक्षक (प्रशासन) या पदावर प्रतिनियुक्ती देण्यात आली होती. त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार याची मोठी उत्सुकता होती. अखेर बिहार (Bihar) सरकारने तातडीने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

राज्य सरकारने 50 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. यातील सर्वाधिक चर्चेतील नाव शिवदीप लांडे यांचे आहे. लांडे याच महिन्यात बिहारमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर लगेचच राज्य सरकारने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची सहरसा विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आधी मुंगेर, सहरसा, रोहतास आणि पाटणा येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

लांडे हे महाराष्ट्रातील आपल्या नोकरीचा कार्यकाळ संपवून याच महिन्यात बिहारची राजधानी पाटणा येथे पोचले होते. यानंतर लगेचच त्यांना महानिरीक्षकांकडून प्रतिनियुक्तीचे पत्र देण्यात आले. मात्र, त्यांना कुठल्या ठिकाणचा पदभार दिला जाणार याबाबत निश्चित झालेले नव्हते. हे निश्चित होईपर्यंत लांडे हे पाटणा शहरातच वास्तव्यास होती. लांडे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

लांडे यांची बिहारमध्ये मोठी लोकप्रियता असून गुन्हेगारांवर त्यांचा मोठी वचक आहे. लांडे हे मूळचे अकोल्याचे असून, ते बिहार केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांना आपल्या मूळच्या राज्यात प्रतिनियुक्तीसाठी पाच वर्षांसाठी येता येते. त्यानुसार ते पाच वर्षांपूर्वी 14 नोव्हेंबर 2016 ला महाराष्ट्रात आले होते. सुरवाताली त्यांना अमली पदार्थ नियंत्रण विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची बढती झाली. यानंतर दहशतवाद विरोधी पथकात उपमहानिरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्याच वेळी त्यांच्याकडे मनसुख हिरेन खून प्रकरणाचा आणि अँटिलिया येथे स्फोटके ठेवल्याच्या गुन्ह्याचा तपास आला होता. मात्र, हा तपास नंतर राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) देण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन चांगले काम दाखविण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही.

शिवदीप लांडेंनी आपल्या नोकरीची सरुवात ही बिहार मधिल मुंगेर जिल्ह्यातुन केली होती. त्यांची कामाबद्दलची ईमानदारी आणि कर्तव्यनिष्ठा याबाबत आजही येथील नागरिकांमध्ये चर्चा रंगतात. मुंगेर जिल्ह्यात त्यांनी दोन वर्ष केलेल्या कार्यकाळात प्रभावित केले होते. यामुळे त्यांना मुंगेरची जबाबदारी दिल्यास येथील वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घातला जाऊ शकतो अशी चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे.

महाराष्ट्रात मनासारखे काम न करता आल्याची खंत

दरम्यान, गेल्यावर्षी त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. मी Maybe today I'm silent, hurt... but.. (मी सध्या शांत आहे, व्यथित आहे..पण) असे त्यांनी म्हटले होते. महाराष्ट्रात त्यांना चांगले पोस्टिंग न मिळाल्याबद्दलची व्यथा तर त्यांनी बोलून दाखवली नव्हती ना, अशी शंका त्या वेळी घेतली होती. बिहारसारख्या राज्यात त्यांच्या कामगिरीने ते देशात गाजले. महाराष्ट्रात मात्र, त्यांना त्या मानाने फारसे करता आले नाही, अशी खंत त्यांचे हितचिंतक बोलून दाखवतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT