DGP Sanjay Pandey
DGP Sanjay Pandey Sarkarnama
प्रशासन

राज्य ATS ला एसपी मिळेना; डीजीपी पांडेंवर आलीय आवाहन करण्याची वेळ

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : कुठलाही सरकारी विभाग असो, सर्वांना क्रीम तथा मलईदार पोस्टिंग हवी असते. पोलिस खात्यातही गुन्हे शाखेत त्यासाठी मोठी चढाओढ असते. तर, विशेष शाखा (स्पेशल ब्रॅंच), वाहतूक शाखेसारख्या दुय्यम विभागात जायला कुणी तयार नसते. लाचलूचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे एसीबी (ACB) आणि सीआय़डीत (CID) नियुक्तीसाठी, तर एक पद पुढचे प्रमोशन तेथील नियुक्तीसाठी दिले जाते. या मानसिकतेतून राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) मुंबई युनीटमधील दोन एसपींच्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. तेथील नियुक्तीसाठी राज्याच्या प्रभारी पोलिस प्रमुखांनाच आवाहन करण्याची पाळी आली आहे.

एकतर, एटीएस ही क्रीम पोस्टिंग नाही. दुसरं म्हणजे तेथे फिट अधिकारी व कर्मचारी लागतो. यामुळे या अधिक्षक दर्जाच्या दोन जागा रिक्त राहिलेल्या असाव्यात. जसे, एसीबी व सीआयडीत एक स्टेप अहेड प्रमोशन दिले जाते, तसे एटीएसमध्ये २५ टक्के विशेष भत्ता दिला जातो. तरी, तेथील जागा मोकळ्या राहिल्या आहेत, हे विशेष. त्यामुळेच नुकतेच सोशल मिडीयाचाही आपल्या कारभारासाठी हुशारीने वापर करणारे राज्याचे प्रभारी पोलिस महासंचालक तथा डीजीपी संजय पांडे यांना फेसबुकवरून त्यासाठी आवाहन करण्याची पाळी आली आहे. ते फेसबुकवरून आपल्या कर्मचाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकतात. आठवडाभरात केलेल्या कामाचा अहवालही सादर करतात. त्याजोडीने पुढील आठवडाभरात काय करणार, ते ही नमूद करतात. मात्र, एटीएसची त्यांची फेसबुकवरील पोस्ट जास्तच चर्चेची ठरली आहे. त्यावर काही तिखट अशा टीकेच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सुमार कामगिरी राहिलेल्या राज्य एटीएसचे अनेक गुन्हे एनआयएकडे गेले आहेत. त्यात ग्लॅमर नसलेल्या या पोलिसांच्या साइड ब्रॅंचला कर्मचारीच नाही, तर अधिकारीही जायला उत्सुक नसतो. याला मुंबई एटीएसमधील एसपींच्या रिक्त दोन जागा दुजोरा देत आहेत. या शाखेचा प्रमुख हा अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचा ज्येष्ठ पोलिस अधिकारी आहे. सध्या विनीत आगरवाल या पदावर आहेत. एटीएसमधून गतवर्षी २६ नोव्हेंबरला मूळ राज्य बिहारमध्ये नियुक्ती असलेले दबंग अधिकारी डीआयजी शिवदीप लांडे हे परत गेले. त्यांचीही जागा अद्याप भरली गेलेली नाही. त्याजोडीने आणखी काही पदेही रिक्त असल्याचे समजते. त्यामुळेच सतर्क व सजग डीजीपी पांडे यांनी या प्रतिष्ठेच्या रिक्त दोन जागांसांठी या विभागाच्या प्रमुखांशी इच्छूक अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (आस्थापना) यांच्याशीही संपर्क साधू शकता येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, राज्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या एवढ्या महत्वाच्या विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची रिक्त पदे राज्य सरकार का नियुक्ती करून भरत नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तोच डीजीपी पांडे यांच्या यासंदर्भातील फेसबुक पोस्टवर एका नेटकऱ्यानेही विचारला आहे. आयपीएस लॉबीचे इकडे दुर्लक्ष का, राज्य सरकार थेट नियुक्ती का करू शकत नाही की त्यांचे अधिकारी ऐकत नाही, असा बोचरा सवालही प्रकाश गाडे या नेटकऱ्याने विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT