Eknath Shinde, Aditya Thackeray
Eknath Shinde, Aditya Thackeray sarkarnama
पुणे

Aaditya Thackeray : सत्तारांचा राजीनामा घ्यायला हवा, पण कोण घेणार? ठाकरे म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Aaditya Thackeray : जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का असे विचारणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा आतातरी राजीनामा घेणार का असा प्रश्‍न शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. सार्वजनिक ठिकाणी पिस्तूल घेऊन वावरणाऱ्या आमदारांना अभय देणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करावी, असा प्रश्‍नदेखील ठाकरे यांनी उपस्थित केला.

सत्तेत असलेले लोक गुंडगिरीची भाषा करीत आहेत. आमदार सार्वजनिक ठिकाणी पिस्तुल घेऊन फिरत आहेत तर कृषी मंत्री जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का अशी विचारणा करीत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्देव असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मुळात महाराष्ट्रात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे, का अशी शंका यावी अशी राज्यातील आताची परिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकार काहीच करायला तयार नाही. केवळ घोषणा करून भागत नाही, हे सरकारला कधी कळणार असा प्रश्‍न ठाकरे यांनी केला.

राज्यातून एकामागून एक उद्योग परराज्यात विशेषत: गुजरातला जात असताना मुख्यमंत्री काय करीत आहेत. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यात राज्याचे प्रश्‍न घेऊन जातात की स्वत:चे प्रश्‍न सोडवायला जातात, असा प्रश्‍न ठाकरे यांनी केला. राज्यात ओला दुष्काळ आहे. शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. अशावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ असताना कोरड्या घोषणांशिवाय सरकारकडून काहीच होत नसल्याची टीका ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी आजच्या दौऱ्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तसेच पुणे जिल्ह्यातील आळेफाटा व शिरूर तालुक्यातील मलठण येथे भेट देत शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. राज्यातील सरकार असंवेदनशील असून खुर्ची वाचविण्यापलिकडे या सरकारला काहीच दिसत नाही. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेण्यासाठी या सरकारला वेळच नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.

राज्यात अनेक ठिकाणी अजून नुकसानीचे धड पंचनामे झाले नाहीत. जिथे झाले तिथे मदतीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आले नाहीत. अक्षरश: गोंधळाची स्थिती आहे. या काळात शेतकऱ्याला धीर देण्याची, आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगून त्याला विश्‍वास देण्याची गरज असताना सरकारमधील जबाबदार लोक शेतकऱ्यांच्या बांधावरदेखील जायला तयार नाहीत, ही बाब गंभीर असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT