Aaditya Thackeray Sarkarnama
पुणे

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा मनसेवर एकच वार; म्हणाले, पावसाळ्यात छत्र्या तशी निवडणुकीत...

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरबाधित परिसराला नुकतीच भेट दिली. पूर परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे पुण्यातील पूरबाधित भागाचा दौरा करत आहेत.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. पावसाळ्यात जशा छत्र्या बाहेर निघतात, त्याच पद्धतीने निवडणूक आली की मनसे बाहेर येते, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.

पुणे दौऱ्यात प्रसार माध्यमांशी आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray संवाद साधला. पुराने बाधित झालेल्या लोकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. कुठलीही पूर्वकल्पना न देता रात्री साडेतीन वाजता धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच विसर्गाचा जो आकडा सांगण्यात येतोय तो ही आकडा देखील चुकीचा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

रात्री अचानक सोडलेल्या पाण्यामुळे पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साठले होते. त्यानंतर लगेचच वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला. यामुळे पूर बाधित लोकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागले. सध्या त्यांचे पंचनामे झाले आहेत. मात्र त्यांना योग्य अशी नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. नुकसान भरपाई मिळाल्यानंतरही ज्यांचे संपूर्ण संसार उध्वस्त झाले आहे ती हानी भरून निघणे शक्य नाही, याकडेही आदित्य ठाकरेंनी लक्ष वेधले.

मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत. याचा फायदा घेत अनेक अनधिकृत बांधकाम तयार झाली आहेत. ही बांधकामे देखील कुठेतरी पूर परिस्थितीला कारणीभूत ठरली आहे, असे म्हणत ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.

पुणे महापालिकेकडून PMC राबवण्यात येणाऱ्या नदी सुधार प्रकल्पामध्ये गुजरात येथील साबरमती नदीच्या प्रकल्पाचे मॉडेल कॉपी-पेस्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुजरातच्या आर्किटेकला पुण्याची परिस्थिती समजते का, हा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. त्यामुळे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट सारख्या प्रकल्पासाठी जो मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहे. तो निधी यासारख्या पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वापरणे आवश्यक आहे, अशी सूचना आदित्य यांनी केली.

मनसेबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मनसे Raj Thackeray हा सुपारीबाज पक्ष आहे. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला केला आहे. हे निवडणूक आले की सुरू होतात आणि नंतर झोपलेले असतात. अशा टपोरी लोकांकडे लक्ष देऊ नये. पावसाळा आला की ज्याप्रमाणे छत्र्या दिसतात त्याप्रमाणे हे पक्ष दिसत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT