Adv. Asim Sarode and Alandi Police Sarkarnama
पुणे

Alandi Police: वारीदरम्यान पारधी समाजाच्या शंभराहून अधिक नागरिकांना डांबून ठेवले; अ‍ॅड. सरोदेंचा पोलिसांवर आरोप

उत्तम कुटे

पिंपरी : आषाढी वारीला यावर्षी पोलिसांमुळे पहिल्याच दिवशी रविवारी (ता.११) आळंदीत गालबोट लागले. पोलिसांनी लाठीमार केल्याचा दावा काही तरुण वारकऱ्यांनी केला. तर त्यावर फक्त झटापट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, हा वाद सुरु असतानाच आळंदी पोलिसांनी शंभर ते दीडशे महिला, मुले आणि पारधी समाजाच्या काही नागरिकांना रविवारी बेकायदेशीरपणे अन्नपाण्याविना डांबून ठेवल्याचा दुसरा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

मानवाधिकार वकील अॅड.असीम सरोदे यांनी यावर भाष्य केलं असून "चौकशीसाठी कुणाला तासभर अटकावून ठेवणे समजू शकतो. पण प्रतिबंधक उपाय म्हणून एवढ्या लोकांना छोट्याशा खोलीत दिवसभर डांबून ठेवणे बेकायदेशीर असल्याचे आळंदीत पारधी समाजाच्या काही नागरिकांना डांबून ठेवण्याच्या पोलिसांच्या कृतीवर 'सरकारनामा'ला सांगितले.

डांबून ठेवलेल्यामध्ये महिला आणि मुले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर, वारीच्या पार्श्वभूमीवरील ही प्रतिबंधक उपाययोजना होती. आषाढी वारी सोहळ्यात सोनसाखळीचोरी (चेनस्नॅचिंग) आणि पाकिटमारीसारखे गुन्हे होऊ नयेत म्हणून या ४८ संशयितांना ताब्यात घेतले होते, असा खुलासा आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी यावर आज केला.

सुर्यास्तानंतर महिलांना सोडून देण्यात आले, तर तिघांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. सीसीटीव्ही फूटेज पाहून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे यावेळी आळंदीत वारी सोहळ्यात चेनस्नॅचिंग व पाकिटमारीच्या गुन्ह्यांना आळा बसल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, पारधी समाजातील 127 ते 150 स्त्रिया, मुले व पुरुषांना वारी आहे, म्हणून आळंदी पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून डांबून ठेवण्यात आल्याचे समजताच अॅड.सरोदे यांनी काल फेसबुक पोस्ट करीत कोणत्या कायद्यानुसार पारधी समाजातील व्यक्तींना ताब्यात घेतले आहे, अशी विचारणा आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना केली.

छोट्याशा जागेत इतक्या जणांना डांबून ठेवल्याने अनेकांचा जीव गुदमरतोय, त्यांना खायला देण्यात आलेले नाही की त्यांना प्यायला पाणी नाही. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना कायदा हातात घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत का हे सांगावे, अशी विचारणा अॅड.सरोदे यांनी स्थानिक एसीपी व डीसीपींना या पोस्टव्दारे केली.

कोणत्या शंकेवरून पोलीस निरीक्षक गोडसे यांनी पारधी समाजातील लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात अटक करून ठेवले? त्यांच्यावर गुन्हा नोंदवला का? अशाप्रकारे मानवी हक्क उल्लंघन करण्याचा गोडसेंना अधिकार कुणी दिला?, अशी प्रश्वांची सरबत्ती त्यांनी केली. पारधी समाजातील बांधवांना केवळ वारीच्या पार्श्वभूमीवर डांबून ठेवणे अन्यायकारक असल्याने त्यांना त्वरित सोडण्याची मागणी त्यांनी केली होती.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT