Dattatray bharane-Dilip Mohite
Dattatray bharane-Dilip Mohite Sarkarnama
पुणे

निधीसाठी राष्ट्रवादी अन्‌ मतदानाला अपक्ष, असे यापुढे चालणार नाही : भरणे, मोहितेंनी टोचले कान!

विलास काटे

आळंदी (जि. पुणे) : आळंदीचे राजकारण म्हणजे निधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अन्‌ नगरपालिका निवडणुकीत मतदानाची वेळ आली की अपक्षांना मत, असे सोयीस्कररित्या सांगितले जाते. मात्र आता हे चालणार नाही, ही मानसिकता बदला आणि पक्षाशी प्रामाणिक राहा. नेत्यांवर विश्वास आणि निष्ठा ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच आगामी पालिका निवडणुकीत काम करून नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा करा, अशा शब्दांत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatreya bharane) आणि आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश करू इच्छिणाऱ्यांचे कान टोचले. (Alandi's council chairman Make NCP : Dattatreya bharane)

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सव्वा आठ कोटीच्या निधीतून आळंदी शहरांतर्गत पद्मावती रस्ता ते चाकण रस्ता रिंगरोडच्या कामाचे भूमिपूजन आणि आळंदी नगरपरिषदेकडून साडेचार कोटीहून अधिक निधीतून विविध ठिकाणी झालेली रस्त्यांची कामे, स्मशानभूमीच्या कामाचे आज (ता. १४ फेब्रुवारी) उदघाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत आळंदी नवीन पाणीपुरवठा योजना भामा आसखेड कुरूळी ते आळंदी कामाचे लोकार्पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी (ता. १२ फेब्रुवारी) झाले होते. पुन्हा तोच लोकार्पण सोहळा आज (ता. १४ फेब्रुवारी) राज्यमंत्री भरणे आणि आमदार मोहिते यांच्या हस्ते झाला.

या वेळी राज्यमंत्री भरणे आणि आमदार मोहिते म्हणाले, ‘‘निवडणुकीत आम्ही बारकाईने लक्ष घालणार आहोत. आळंदीच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही, याची दक्षता राष्ट्रवादीकडून घेतली जाईल. मात्र, आपणही राष्ट्रवादीच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. चार वर्षे पक्षासोबत असणारा माणूस ऐन निवडणुकीच्यावेळी पक्षाचे चिन्ह घेतलं की अडचण होते, अस सांगतो. मतदार विकासकामाला राष्ट्रवादी अन मतदानाची वेळ आली की अपक्षांना मत देतो, अस काही नसतं.’’ या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव यांची उपस्थिती होती.

भविष्यात स्थानिक बाजूला व्हाल आणि बाहेरचे राज्य करतील : मोहिते

केवळ एकमेकांच्या श्रेयवादासाठी भांडत असाल तर विकास बाजूला राहील. मराठवाड्याहून आळंदीत स्थलांतरित लोक शिवसेना-भाजपला मत देतात, हा समज चुकीचा आहे. जर असे होत असेल तर मतदारयादीत मतदान लावायचे, हे तुमच्याच हातात आहे. दुबार मतदार रोखा. काही दिवसांनी स्थानिक नेते बाजूला व्हाल आणि बाहेरचे राज्य करतील, हा धोकाही आमदार दिलीप मोहिते यांनी पदाधिकाऱ्यांना भाषणातून दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT