Amol Kolhe - Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Amol Kolhe On Devendra Fadnavis : शरद पवारांचा नेता म्हणतो,दिल्लीतून पुन्हा एकदा फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न...

Deepak Kulkarni

Pune News : महाराष्ट्र भाजपमधला सर्वात वजनदार व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातं. म्हणूनच केंद्रातील मोदी-शाह या जोडीने महायुती सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी फेटाळून लावत फडणवीसांना त्याच रोलमध्ये कायम ठेवले. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून दिल्लीसह महाराष्टातही देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) वजन चांगलंच वाढलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठवण्यात आली.

यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही त्यात प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या हात धुवून घेतले.आता विधानसभेसाठी पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झालेल्या फडणवीसांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे. यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

शिरूरचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फायरब्रँड नेते अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता.१०) मंचर येथे मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले.तसेच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांविषयी मोठी शंका उपस्थित केली आहे.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाणार होती. पण आता दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे विधान कोल्हे यांनी केले आहे.या त्यांच्या विधानामुळे भाजपसह महायुती आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना राज्यात अशांतता राहावी,असे वाटत असल्याची टीका होती.त्या टीकेला खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.ते म्हणाले,मुख्यमंत्र्यांच्या टीकेमध्ये कोणतेही तथ्य नाही.राज्यात सरकार महायुतीचे आहे,त्यांनी आरक्षणाबाबतची भूमिका आधी स्पष्ट केली पाहिजे. त्यांनीच आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला आहे असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कडाडून टीका केली होती.त्यावरही कोल्हे यांनी महाविकास आघाडीची आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सरकारने जनतेत संभ्रम पसरवू नये.महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट असून यातून सक्षम तोडगा काय तो समोर आणावा असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदेंचा व्हायरल झालेल्या व्हिडिओचा संदर्भ देत आपण काय बोलायचे आणि निघून जायचे यामध्ये त्यांची काय भूमिका आहे हे समजणे गरजेचे असल्याचं टोला लगावला आहे. कोल्हे यांनी यावेळी सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल असा तोडगा सरकारने काढणे गरजेचे असल्याचंही मत व्यक्त केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT