Shivajirao Adhalrao Patil, Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Amol Kolhe News : 'हा' आहे आपल्या दोघांतील फरक ! अमोल कोल्हेंनी आढळरावांना फटकारलं

सरकारनामा ब्यूरो

Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले आहे. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे आहे. मात्र त्यावर भाजपकडूनही वारंवार दावा सांगितला जात आहे. अशातच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सतत टीकेची झोड उठवली आहे. या टीकेचा खासदार कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. (Latest Political Marathi News)

सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथ होत आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील बिनीच्या शिलेदारांनी बंडखोरांना साथ दिली. हाच धागा पकडून खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सुनावले आहे. यावेळी खासदार कोल्हे यांनी आढळराव आणि त्यांच्यातील मूलभूत फरकच सांगितला.

अमोल कोल्हे म्हणाले, "शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला २००४, २००९, २०१४, २०१९ असे चारवेळा लोकसभेचे तिकिट दिले. त्यामुळे तुम्ही खासदार झाला. तुम्ही मात्र आपल्या स्वार्थासाठी ठाकरे यांच्या अडचणीच्या काळात त्यांना सोडून गेलात. दरम्यान, शरद पवार यांनी मला फक्त २०१९ मध्ये एकदाच लोकसभेचे तिकिट दिले.आज त्यांच्या अडचणीच्या काळात मी त्यांच्यासोबत उभा आहे. हा आपल्या दोघांतील फरक आहे."

माजी खासदार आढळराव पाटील यांनी वैयक्तिक टीका केल्याने कोल्हे यांनी आपला संताप व्यक्त केला. कोल्हे म्हणाले, "तुम्ही माझ्या अभिनयाची कुचेष्टा केली. अभिनय माझ्या चरितार्थाचे साधन आहे. अभिनय माझा छंद आहे. शिरूरच्या जनतेला माहित आहे की माझी अमेरिकेत कुठेही कंपनी नाही. जनतेने विश्वासाने मला लोकसभेत पाठवले. त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन लोकसभेत मी फक्त संरक्षणविषयक प्रश्न उपस्थित करून माझ्या कंपनीचे उखळ पांढरे करून घेत नाही. तशी चर्चा कुठेही शिरुरमध्ये होत नाही. मी माझे छंद चार माणसांत उजळमाथ्याने सांगू शकतो. तशी आपल्या छंदाची परिस्थिती आहे का, असा अडचणीचा प्रश्न विचारून आपल्यासारख्या वयस्कर माणसाची गोची करू इच्छीत नाही."

काय म्हणाल होते आढळराव पाटील ?

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली होती. आढळराव म्हणाले होते, "डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेची सरळसरळ फसवणूक केली. शिरूरमधील जनतेशी त्यांनी प्रतारणा केलेली आहे. एका गावात मी काम केले असे त्यांनी ठामपणे सांगावे. बोलताना ते अभिनयाच्या जोरावर नाटकी आवाजात सांगतात मी दिलेले शब्द पूर्ण केले, मात्र तसे काहीही झालेले नाही. तसे त्यांनी एकही काम दाखवावे. त्यांनी मालिका, सिनेमे, नाटके खूप केली. मात्र मतदारसंघात त्यांनी गेल्या चार वर्षांत काय काम केले, असा प्रश्न मी मतदारसंघातील एक सामान्य नागरिक म्हणून विचारत आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT