Ashok Chavan, Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Ashok Chavan Resigns : चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीबाबत आंबेडकर निर्धास्त...

Sudesh Mitkar

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकींनंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासह अशोक चव्हाणांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. (Ashok Chavan Resigns)

पुण्यात अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलताना आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, मी यापूर्वी सांगितले आहे की जसजशा निवडणुका येतील तसा राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. भाजपने कितीही प्रयत्न करून याला घे, त्याला घे, हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, असं केलं तरी महाराष्ट्रात त्यांना यश मिळणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक मतदारसंघामध्ये माझे दोन-दोन दौरे झाले असून, या दौऱ्यादरम्यान लोकांची मानसिकता प्रकर्षाने समोर आली आहे.

महाराष्ट्र (Maharashtra) हा यापूर्वी इतका वादग्रस्त नव्हता आणि महाराष्ट्रात स्थिर सरकारं असायची. मात्र, सध्या पक्ष फोडणं, गोळीबार करणं, धमकावणे असे प्रकार सर्रास चालले आहेत. हे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणार नाही. त्यामुळे सामान्य माणूस हा निवडणुकीची वाट बघत असून, योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, असं आंबेडकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोठे नेते गेल्याने महाविकास आघाडीवर परिणाम होईल का? या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, या नेत्यांच्या जाण्याने महाविकास आघाडीला कोणताही परिणाम होणार नाही. कारण एखादा व्यक्ती पक्ष सोडून गेला तरी पक्षाचे अस्तित्व कायम राहतं. त्यामुळे पक्षावर त्याचा फार परिणाम होतो, असं मला वाटत नाही.

ओबीसींनी राजकीय पक्ष काढावा

आंबेडकर म्हणाले, ओबीसी संघटनांनी राजकीय पक्ष काढण्याचे आवाहन केलं आहे. सल्लागार म्हणून छगन भुजबळ यांचे नाव समोर केले आहे. आम्ही छगन भुजबळ यांना ओबीसीचे नेतृत्व करावे, असे आवाहन केले आहे.

भाजपमधून बाहेर पडला आणि ओबीसीचे नेतृत्व केलं तर आम्ही आपल्याला मदत करू, अशी भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. आता ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी भुजबळ काय पावलं उचलतात, हे पाहवं लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर आहेत आणि जेवढे नेते चौकशीच्या फेऱ्यात आहेत, त्यांना ते  नाचवणार आहेत. काल देशभरामध्ये साडेचारशे ठिकाणी धाडी घालण्यात आल्या असून, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT