MP Shrikant Shinde, Eknath Shinde, Shrirang Barne Latest News
MP Shrikant Shinde, Eknath Shinde, Shrirang Barne Latest News  Sarkarnama
पुणे

त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे मला सातत्याने फोन करायचे...बारणेंनी केलं गुपित उघड...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवसेनेसोबत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेलेल्या शिवसेनेच्या बारा खासदारांपैकी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे बंड केल्यावर प्रथमच शुक्रवारी (ता.22 जुलै) आपल्या मतदारसंघात आले आहेत. यावेळी त्यांनी आपण बंड का केलं आणि त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी आणि शिवसेनेची आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ का सोडली याबाबतचा सविस्तर खुलासा त्यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. तसेच शिंदे गटात जाण्याआधी काय घडलं होतं या प्रश्नांची सडेतोड उत्तरे मुलाखती दरम्यान दिली आहेत. (MP Shrikant Shinde, Eknath Shinde, Shrirang Barne Latest News)

आपण शिवसेना का सोडली? या प्रश्नावर बोलतांना बारणे म्हणाले, जे घडत होतं त्या सगळ्या घडामोडीमध्ये मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो. मात्र, ज्यावेळी खासदारांची बैठक झाली त्यावेळी मी ठाकरेंना सांगितलं की, या परिस्थितीतून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल आणि भाजपसोबत जायला पाहिजे. तसेच यासाठी सर्वांशी चर्चाही आपण केली पाहिजे. मात्र ते राष्ट्रवादी आणि आघाडीतून बाहेर पडायला तयार नव्हते यामुळे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याच ठरवलं, असे ते म्हणाले.

मुलाखती दरम्यान 'सरकारनामा' प्रतिनिधीने हे बंड करण्याआधी तुम्हाला मुख्यमंत्री शिंदे यांचा कधी फोन आला आणि काय बोलणं झालं होतं?, असा प्रश्न विचारला तेव्हा बारणे म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांचा मला कधी फोन आला नाही. मात्र माझ्याबरोबर असणारे त्यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे सातत्याने अगदी पहिल्या दिवसापासून मला फोन करत होते. मात्र मी त्यांना सांगितलं होत की, मी पक्षप्रमुखांसोबत राहणार आहे. मात्र पक्षप्रमुख ठाकरेंनी महाविकास आघाडींला सोडायच नाही आणि सर्वांनी एकसंघ राहूनच आगामी निवडणूका लढायची भूमिका मांडली होती. यामुळे मी माझ्या मतदारसंघाचा विचार केला आणि यामधून काही साध्य होणार नाही. म्हणून परिस्थितीचा विचार करून शिंदेच्या सोबत जाण्याचा विचार केल्याचा खुलासा त्यांनी केला.

शिंदे गटात गेलेल्या आमदारांना 50 कोटींची ऑफर असल्याची चर्चा होती तर खासदारांना किती कोटींची ऑफर होती? या प्रश्नावर बारणे उत्तर देतांना म्हणाले की, मीडियात राजकारणावर अशा चर्चा होत असतात. मात्र 51 आमदार आणि सुमारे 12 ते 14 खासदार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे पक्ष सोडून जातात ही त्याच्या मनातली खदखद होती. बाळासाहेबांनी ज्या विचाराने शिवसेना निर्माण केली त्या विचाराला बाधा निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून झालं होते म्हणून अनेत आमदार खासदार आणि शिवसैनिक नाराज होते. आम्ही जेव्हा शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने बाहेर पडलो तेव्हा जनमाणसांमध्ये मोठी नाराजी होती. याच नाराजीतून जे घडलं ते घडत आहे, असे उत्तर बारणेंनी दिले.

दरम्यान, आपण पुढचा मावळचा उमेदवार मीच असणार असे जाहीर केलं मात्र चिन्ह कुठलं असणार? या प्रश्नावर बोलतांना बारणे म्हणाले की, येणाऱ्या परिस्थितीवर हे सर्व ठरवलं जाईल. मात्र या घडामोडीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी ठरवलं की, ज्या-त्या मतदारसंघांच्या उमेदवाराच्या सोयीनुसार त्यावेळी विचार केला जाईल. तसेच तुम्ही स्थानिक आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्याशी जुळवून घेणार का? या प्रश्नावर ते म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनी माझ्या प्रचारात भाग घेतला होता. त्यामुळे मी 2019 लाच त्यांच्याशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे आता जुळवण्याचा संबंधच येत नाही, असेही बारणेंनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT