Yashomati Thakur, Baba Siddique Case Sarkarnama
पुणे

Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावरून यशोमती ठाकूर यांचा महायुतीवर हल्लाबोल; म्हणाल्या, "गुंड प्रवृत्तीचे लोक..."

Sudesh Mitkar

Pune News 13 Oct : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर आता राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था अत्यंत खालच्या पातळीवर गेले असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे.

अशातच ही घटना घडल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतलं आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणावरून महायुती (Mahayuti) सरकारवर सडकून टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील काँग्रेसकडून (Congress) इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. याची जबाबदारी यशोमती ठाकूर यांच्यावर सोपवण्यात अली आहे. यासाठी त्या पुण्यात आल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या, सध्या राज्यात कुणालाही कायदा आणि सुव्यवस्थेचा काही देणं घेणं राहिलेलं नाही. जेव्हापासून हे महायुती सरकार सत्तेवर आले आहे. तेव्हापासून गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुंड प्रवृत्तीची लोक सत्तेत आल्यानंतर काय होतं हे आपल्याला दिसत आहे. सध्या चाललेल्या घटनांची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.

एका आमदाराचे वडील जे स्वतः माजी मंत्री होते त्यांचा खून होत असेल तर सामान्य व्यक्तीचं काय. त्यांच्या हत्येमुळे मी फार डिस्टर्ब आहे. आम्ही सोबत काम केले आहे. राजकारणामध्ये ते आम्हाला गाईड करायचे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने प्रचंड दुःख झाले आहे. या प्रकारच्या गोष्टी यापूर्वी महाराष्ट्रात कधीच झालेल्या नाहीत. हा महाराष्ट्र धर्माचा अपमान असून तो सातत्याने हे सत्ताधारी करत असून त्यांना सत्तेमध्ये बसण्याचा कोणताही अधिकार नाही.

सध्या महाराष्ट्राचा बिहार झाला असल्याची टीका ठाकूर यांनी केली. कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात सबंध महाराष्ट्रात घटना घडत आहेत. या घटनांना जेवढे गृहमंत्री जबाबदार आहेत, तेवढेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील जबाबदार आहेत. गुंड प्रवृत्तीची लोक सत्तेत आल्याने गुंड सुसाट सुटले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा निशाणा ठाकूर यांनी साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT