Chandrakant Patil, Amol Kolhe, Shivajirao Adharao Patil
Chandrakant Patil, Amol Kolhe, Shivajirao Adharao Patil Sarkarnama
पुणे

Shirur News : चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे आढळरावांचे टेन्शन वाढले; शिरुरमध्ये पुन्हा राजकीय भूकंप?

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : भाजप नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या विषयी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक विधान केले आहे. त्यामुळे माजी खासदार आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचे टेन्शन वाढले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आता खुद्द चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे त्याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी 'साम टीव्ही'ला विशेष मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी कोल्हे यांच्या विषयी भाष्य केले.

या मुलाखतीत पाटील म्हणाले, "भाजपसोबत आलेल्या शिंदे गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयांचा फायदा होणार आहे. आता मात्र, महाराष्ट्रातील परिस्थिती कधी नव्हे इतकी अस्थिर झाली आहे. ही स्थिती सतत बदलत आहे. त्यामुळे जागावाटपबाबत आत्ताच काही निर्णय घेता येणार नाही."

जागावाटपाच्या चर्चेत त्यांनी शिरुरच्या (Shirur) जागेबद्दलही मत व्यक्त केले. या वेळी त्यांनी खासदार कोल्हे यांच्या भाजप (BJP) प्रवेशाबाबत म्हणाले, "लोकसभा निवडणूक प्रक्रिया डिसेंबर-जानेवारी महिन्यात सुरू होईल. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूक होईल. राज्यातील राजकीय स्थिती पाहता शिरुर लोकसभेच्या जागेबाबत आत्ताच कसे ठरवणार? समजा उदाहरण म्हणून कोल्हेंना वाटले की आपण भाजपमध्ये जावे, तर त्यांनी शिंदे गट का भाजपकडून निवडणूक लढवायची ते त्यांना ठरवावे लागेल."

"अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना वाटू शकत की आपण भाजपमध्ये जावे, अशा वेळी आढळराव (Shivajirao Adhalrao Patil) यांची समजूत घालावी लागेल." असे विधान पाटील यांनी केल्यामुळे आढळरावांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. आढळराव पाटील ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेल्यानंतरही त्यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छ पूर्ण होणार की नाही, या विषयी संभ्रम आहे. पाटील यांनी केलेल्या सूचक विधानामुळे शिरुरमध्ये राजकीय घडामोडी घडणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मात्र, पाटील यांच्या वक्तव्यामुळे आढळराव पाटील यांचे नक्कीच टेन्शन वाढणार, असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पक्ष बदलाबाबत खासदार कोल्हे यांनीच संदिग्धता निर्माण केलेली होती. ते म्हणाले होते की, "मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की शेतकरी उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही. वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचे असते आणि मग वावर नांगरायला घ्यायचे असते.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT